दोन दिवसांपूर्वी टीका करणाऱया इस्रायली चित्रपटकाराची कोलांटी
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या काश्मीर फाईल्स या चित्रपटावर टीका करणारे इस्रायली चित्रपटनिर्माते नावाद लापिड यांनी अवघ्या दोन दिवसांत कोलांटी मारली आहे. हा चित्रपट उत्कृष्ट आहे, असे मतप्रदर्शन त्यांनी आता पेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.
काश्मीर फाईल्स हा चित्रपट ‘व्हल्गर’ असून तो अपप्रचार करणारा आहे. अशा चित्रपटाला गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटात स्थान द्यावयास नको होते, अशी टीका त्यांनी तीन दिवसांपूर्वी केली होती. त्यामुळे सोशल मिडियावर त्यांना धारेवर धरण्यात आले होते. इस्रायलच्या भारतातील राजदूतांनीही त्यांच्या या विधानावर तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली होती. लापिड यांना त्यांनी एक खरमरीत खुले पत्र लिहून त्यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर बुधवारी अचानक पलटी घेत त्यांनी या चित्रपटाची तोंड भरुन स्तुती केली. आपल्या मूळच्या टीकेला छेद देणारी विधानेही केली. हा चित्रपट अपप्रचार करणारा आहे, असे आपण म्हटले होते. पण अपप्रचार किंवा प्रोपोगेंडा म्हणजे नेमके काय, त्याची व्याख्या काय हे निश्चितपणे सांगता येणार नाही. हे प्रत्येकाचे मत असते, अशी पुस्ती जोडून हा चित्रपट उत्कृष्ट (ब्रिलियंट) असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. त्या मुलाखतीत त्यांनी हे त्यांचे नवे मत मांडले.
जे पाहिले ते बोललो
या चित्रपटात मी जे पाहिले, मला जे भावले ते मी बोललो. मात्र, ते माझे मत होते. हा चित्रपट उत्तम आहे. त्यावर कोणाचीही उलटसुलट मते असू शकतात. माझेही असू शकते. पण म्हणून चित्रपटाची गुणवत्ता मानावीच लागते, असे स्पष्टीकरण देऊन मागे केलेल्या टिकेवर सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
इतरांचेही तेच मत
या चित्रपटासंबंधी मी जे प्रथमदर्शनी मत व्यक्त केले, तेच इतर परीक्षकांचेही होते. पण त्यांनी ते व्यक्त केले नाही. मी माझे मत व्यक्त केले. पण ते व्यक्तीगत होते. माझ्या मतावर जो टीकेचा गदारोळ उठला तो लोकांना प्रक्षुब्ध करण्यासाठीचा एक हलक्या दर्जाचा प्रयत्न होता. माझ्या विधानाचा अर्थ नीट समजून घेतला गेला नाही. असे असले तरी, चित्रपट चांगलाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विवेक अग्निहोत्री यांचे आव्हान
लापिड यांच्या टीकेनंतर या चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी सर्व टीकाकारांना जाहीर आव्हान दिले आहे. या चित्रपटातील एकही दृष्य, एकही प्रसंग आणि एकही संवाद खोटा आहे हे जगातील कोणत्याही टीकाकाराने सिद्ध केल्यास आपण चित्रपटनिर्मिती बंद करु, असे हे आव्हान आहे. हे आव्हान कोणताही टीकाकार पेलू शकणार काही, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी आपला पुढचा प्रकल्प ‘काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड़’ हा असेल अशीही घोषणा त्यांनी केली. त्यामुळे ते काश्मीरमधील हिंदूंच्या सत्यपरिस्थितीचे अधिक दाहक चित्रण असणारा आणखी एक चित्रपट आणतील अशी शक्यता आहे.