प्रतिनिधी /मडगाव
बहुचर्चित ‘काश्मीर फाईल्स’ आज रिलीज झाला. मडगावच्या ‘आईनॉक्स’ थिएटरमध्ये काल हा सिनेमा दाखविण्यात आला. मात्र, संपूर्ण थिएटरमध्ये या सिनेमाचा एकही पोस्टर न लावल्याने त्याला जोरदार हरकत घेण्यात आली. दवर्ली येथील स्वामी समर्थ गडाचे जयेश नाईक यांनी थिएटर व्यवस्थापकाला या प्रकरणी जाब विचारला.
आईनॉक्स थिएटरमध्ये काल या सिनेमासाठी केवळ 40 टक्केच बुकिंग झाले असताना, शो फुल झाल्याचे सांगण्यात आल्याने थिएटर व्यवस्थापक फसवणूक करीत असल्याचा आरोप यावेळी जयेश नाईक यांनी केला. आईनॉक्स थिएटरने जर काश्मीर फाईल्स सिनेमाचे पोस्टर लावले नाहीत तसेच तिकीट बुकिंगाची सत्य परिस्थिती सांगितली नाही तर संभाव्य परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा ही यावेळी देण्यात आला.
जयेश नाईक तसेच त्याच्या इतर समर्थकांनी रविवारी आईनॉक्स थिएटर्नाला भेट देऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली. थिएटरमध्ये काश्मीर फाईल्स सिनेमा दाखविला जात असताना सुद्धा त्याचा एक ही पोस्टर लावण्यात आला नसल्याचे त्यांना आढळून आले. इतर सिनेमाचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले होते. मग काश्मीर फाईल्स सिनेमाचा एकही पोस्टर का लावण्यात आलेला नाही याचे स्पष्टीकरण थिएटर व्यवस्थापकाकडे मागण्यात आले. परंतु, तो योग्य असे स्पष्टीकरण देऊ शकला नाही. त्याच बरोबर केवळ 40 टक्के बुकिंग असताना शो फुल झाल्याचे का सांगण्यात आले यावर देखील स्पष्टीकरण देऊ शकला नाही. त्यामुळे थिएटर व्यवस्थापकाच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करण्यात आली.
हा चित्रपट जनतेसाठी पाहणे आवश्यक असून त्यासाठी पोस्टर लावणे तसेच बुकिंगची सत्य परिस्थिती लोकांना कळली पाहिजे अशी ताकीद देण्यात आली. दरम्यान, सिने विशांत मध्ये सुद्धा हा सिनेमा दाखविला जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी आईनॉक्स थिएटरच्या व्यवस्थापकाकडे बोलणी करून सायंकाळी काश्मीर फाईल्स संदर्भात जो प्रकार घडला होता. तो पुन्हा घडू नये यासाठी बोलणी केली व त्यावर तोडगा निघाल्याचे फेसबुक पोस्टद्वारे जनतेला कळविले आहे. त्याच बरोबर हा सिनेमा टेक्स फ्रि करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
जानेवारी 1990 … काश्मीर खोऱयातला काळाकुट्ट रक्तरंजित कालखंड ! दोन दिवसात लाखो काश्मीरी पंडितांनी आपली जन्मभूमी, कर्मभूमी आणि आयुष्यं गमावली. ‘रालीव’ ‘त्सालीव’ या ‘गालीव’, अर्थात धर्म बदला (इस्लाम स्वीकारा) जागा सोडा (काश्मीरमधून निघून जा) नाहीतर मरा ! ही धमकीवजा घोषणा जम्मू कश्मीर लिबरेशन प्रंटने अंमलात आणून काफरांचा, अर्थात काश्मीरी पंडितांचा कत्तलखाना सुरू केला. 19/20 जानेवारी 1990 उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली. काश्मीर खोऱयातल्या हिंदूंचे अस्तित्व पुसण्याचा आणि पुरोगामी फाईलींमधे बंद करून टाकलेला हा रक्तरंजित इतिहास, आज बत्तीस वर्षांनी देशासमोर या सिनेमाच्या माध्यमांतून जनतेसमोर ठेवण्यात आला आहे.