युएनएचआरसीमध्ये भारताने सुनावले
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेत (युएनएचआरसी) काश्मीर मुद्दा उपस्थित करणाऱया पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटनेवर भारताने टीकेची झोड उठविली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून प्रतिबंधित दहशतवाद्यांना उघड समर्थन करणाऱया देशाच्या स्वरुपात पाकिस्तानची ओळख निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, त्यांचा खर्च उचलणे आणि दहशतवाद्यांना देशाच्या धोरणाच्या स्वरुपात मान्यता देणे हीच पाकिस्तानची खरी ओळख असल्याचे भारताने मानवाधिकार परिषदेच्या 48 व्या अधिवेशनात म्हटले आहे.
दहशतवादाचे केंद्र आणि मानवाधिकारांची सर्वात खराब स्थिती असलेल्या आणि अपयशी देश ठरलेल्या पाकिस्तानकडून भारताला शिकवण घेण्याची गरज नाही. भारताच्या विरोधात स्वतःचा खोटा आणि दुष्टहेतूयुक्त प्रचार करण्यासाठी अशा व्यासपीठांचा गैरवापर करणे ही पाकिस्तानची खोडच झाली असल्याचे भारताच्यावतीने पवन बाधे बोलताना म्हटले आहे.
पाकिस्तानच्या सरकारकडून केल्या जाणाऱया गंभीर मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून लक्ष हटविण्याच्या प्रयत्नांची कल्पना युएनएचआरसीला आहे. पाकिस्तानात काय घडतेय हे सर्वांनाच ज्ञात आहे. पाकिस्तान सातत्याने युएनएचआरसीच्या व्यासपीठाचा गैरवापर खोटा आणि दुष्ट हेतूयुक्त अजेंडा फैलावण्यासाठी करतो. शीख, हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदिया समवेत स्वतःच्या अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यास पाकिस्तान अपयशी ठरल्याचे बाधे म्हणाले.
पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदायांच्या हजारो महिला आणि मुली अपहरण, बळजबरीचा विवाह आणि धर्मांतराला बळी पडल्या आहेत. पाकिस्तानसारख्या अपयशी देशाने जगातील सर्वात मोठय़ा आणि जिवंत लोकशाही असलेल्या भारताला शिकवण देण्याची गरज नाही. तर पाकिस्तानकडून ओलीस होण्याची वेळ इस्लामिक सहकार्य संघटनेवर आल्याचे भारताने सुनावले आहे.