प्रतिनिधी/ सातारा
अजूनही कोरोनाचा कहर कमी झालेला नाही. तरीही नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत. सोशल डिस्टन्स व मास्क वापरत नाहीत. पर्यटनस्थळावर गर्दी करताना दिसत आहेत. नुकताच पाऊस सुरु झाला आहे. त्या पावसाच्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सातारा नजिकच्या कास पठारावर गर्दी होत असते. मंगळवारी अशीच गर्दी झाली होती. सातारा तालुका पोलिसांनी मंगळवारी दिवसभर मोहिम राबवून 50 जणांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून दंड वसूल केला.
सातारा शहरापासून कास पुष्प पठार सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. काही फुले आली आहेत. त्या फुलांचा व ढगांच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी सातारकर बाहेर पडत आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात नियम पाळूनच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे असे प्रशासन आवाहन करत आहे. मात्र, सोशल डिस्टन्सचा नियम तोडून साताकर बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर घाटात तपासणी मोहिम राबवण्यात आली होती. सकाळपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत नियम मोडून फिरायला जाणारे अनेकजण आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.