वार्ताहर / कास
कास तलाव शेजारील कास बामणोली हा मुख्य रस्ता धरणाच्या भिंतीच्या बांधकाम क्षेत्रात बाधीत झाल्याने जवळुनच त्याला पर्यायी पक्का रस्ता निर्माण करणे गरजेचे होते. मात्र अद्याप त्याठिकाणी पर्यायी पक्का रस्ता नसल्याने गेल्या दोन वर्षापासुन तेथुनच मातीच्या राडय़ारोडय़ातुन वाहतूक सुरु आहे. मात्र आता पावसाळा जवळ आला असुन धरणाचा नवा सांडवा व नवीन पुलाचे कामही उर्वरित काळात पूर्ण होणे कठीण आहे. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱया कास धरणाची उंची वाढली पण आमच्या रस्त्याचं काय?, पुलाचे काम नसल्याने आम्ही ये-जा कशी करायची असा सवाल नागरिकांनी केला आहे. तसेच उरलेल्या वेळात जुन्या पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण तरी करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कास धरणाचे उंची वाढवण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. धरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना या धरणाच्या भिंतीवरून मुख्य सातारा- कास- बामणोली रस्त्याला जोडण्यासाठी पूलाचे काम चालू आहे. सद्यस्थितीत हा पूल प्राथमिक अवस्थेत असून हा पूल पावसापूर्वी होण्याची शक्यता फारच कमी असल्याने बामणोली भागातील सर्व गावे आणि कास धरणाच्या पलिकडील तांबी, जुंगटी परिसरातील गावांची वाहतुकीची कोंडी होणार आहे.
कास धरणाची उंची वाढवण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना सद्या धरणातील पाणी बाहेर पडण्यासाठी लागणाऱया सांडव्याचे काम चालू आहे. या सांडव्याच्या वरूनच कास गावालगतच पूलाचे काम चालू आहे. सद्यस्थितीत पूलाचे काम पायातच असून या परिसरात जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून पावसाला सुरुवात होते. जेमतेम पंधरा दिवस ते तीन आठवडय़ांचा कालावधी उन्हाळ्याचा शिल्लक असून एवढय़ा दिवसात पूलाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. सद्या धरणाचे काम चालू असलेल्या परिसरातून कच्चा रस्ता वाहतुकीसाठी सुरू असून थोडासा पाऊस झाला तरी मातीमुळे चिखल तयार होतो.
चिखलात गाडय़ा चालवणे अवघड बनत असून अपघातांचा धोका वाढला आहे.
कास धरणाचे काम ही कूर्मगतीने चालू असून तलाव भरल्यानंतर पाणी वाहून जाणारा जुना ओढा नवीन धरणाच्या भिंतीत गेला आहे. त्यामुळे पहिला पाण्याचा प्रवाह असणाऱया जागेवर भराव टाकून रस्ता ओढय़ाच्या पलिकडे काढला आहे. त्या ठिकाणी ही पाणी जाण्यासाठी भरावाखाली मोऱया नसल्याने पाणी पलिकडे कसे जाणार हा प्रश्नच आहे.
सद्या कच्चा असणारा मातीचा रस्ता पक्का करण्याचे नियोजन असल्याचे ठेकेदाराकडून सांगितले जात असले तरी पावसापूर्वी ही सर्व काम न झाल्यास बामणोलीसह कास परिसरातील गावांचा वाहतुकीचा प्रश्न अडचणीचा ठरणार आहे.