प्रतिनिधी/ सातारा
कास जलाशयातुन शहरातील पश्चिम भागास पाणी पुरवठा होतो. पण गेल्या काही महिन्यांपासुन येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्या कारणाने नागरिक हैराण झाले आहेत. आत्ताच ही परिस्थिती आहे तर उन्हाळय़ात काय स्थिती होईल याची धास्ती आता या परिसरातील नागरिकांना भेडसावत आहे. कारण या पश्चिम भागातील बोगदा परिसर, दस कॉलनी या भागात गेल्या दिड महिन्यापासुन अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे.
याचा प्रामुख्याने फटका हा अपार्टमेंटमधल्या नागरिकांना बसत आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने कित्येक अपार्टमेंटमधल्या रहिवाशांना पाणीच मिळत नाही. परिणामी त्यांना टँकरने पाणी विकत घेऊन वापरावे लागत आहे. त्यामुळे नोकरदार महिलांना आपल्या कामाची वेळ सांभाळुन उर्वरित वेळ हा इकडुन-तिकडुन पाणी आणण्यातच जात आहे.
पाणी पुरवठा विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन वॉलमध्ये काही दुरूस्ती असल्यास ती त्वरित करून घ्यावी. अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडुन करण्यात येत आहे. पाण्यासाठीची बिल नियमित आहेत मग पाणी पुरवठा देखील नियमित करण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडुन करण्यात येत आहे.