टोप/शिये/प्रतिनिधी
कासारवाडी गावापासुन सुरु हाेणार्या सादळे मादळे घाटाच्या पहिल्या वळणावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास तीन गवे शेतकरी व व्यायामासाठी येणार्यांना दिसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवारी सादळे मादळे परीसरात गवे असल्याचे काही गुरे राखणारे यांना दिसले हाेते. पण पुन्हा आज सकाळी तीन गवे हे मादळे गावाकडून पुन्हा फिरुन हे गवे कासारवाडी डाेंगरातील साई मंदिर पासून लिंबाचा पहिला कॉर्नर येथून जेनेसिस काॅलेज परीसर, तेलवेकर खाेरीत गेले आहेत. आज रविवारचा दिवस असल्याने श्री क्षेत्र जाेतिबा दर्शनासाठी येणारे व जाणार्या भाविकांची जास्त गर्दी असते, त्यामुळे याची दखल वन विभागाने घेणे गरजेचे आहे.
सध्या कासारवाडी तेलवेकर खाेरी व काॅलेज परिसर याठिकाणी घनदाट झाडी आहे. या झाडीत निगडी ओघळ पाण्याचे ठिकाण आहे. पण गवे आलेले असताना देखील सकाळपासून वनविभागाची कोणतीही टीम दाखल झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, करवीर तालुक्यातील सादळे – मादळेसह कासारवाडी, अंबप व मनपाडळी परिसरात गव्याच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारी दि. १५ रोजी व रविवारी सकाळी सलग दोन दिवस या परिसरात तीन गवे एकत्र फिरताना पहावयास मिळाले. आज सकाळी सादळेतील जेनिसिस महाविद्यालयापासून कासारवाडी मार्गे अंबपच्या दिशेने हे गवे गेले. वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.
गव्याच्या हल्ल्यात भुयेवाडी येथील युवकाच्या मृत्यूला नुकताच एक महिना झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील गव्याची भीती अद्याप ताजी आहे. अशा परिस्थितीत तीन – तीन गवे एकत्र फिरत असल्याने शेतकरी शेतात जायला घाबरू लागले आहेत. वन विभागाने मात्र ग्रामस्थांनी घाबरू नये, विनाकारण गव्याला डिवचू नये, गव्याचे मार्ग आडवू नका, गर्दी करु नका असे आवाहन केले आहे.