आठवड्याभरातील तिसरी घटना; तीन्ही घटनेत एकूण ६० एकर ऊस जळून खाक
कासेगाव/प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील हायवेच्या पूर्व भागातील ब्राम्हणपुरी मळ्यामध्ये ६ एकर ऊसाला अचानक आग लागून सुमारे १२ लाखाचे नुकसान झाले. हि घटना आज दुपारच्या दरम्यान घडली असून गौड रस्ता तोडकर पाणंद भाग येथील ४० एकर असा एकूण ४६ एकर उसाच्या फडाला आग लागून ३० शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक आग लागली असावी, असा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात वाटेगाव येथे आठ एकर उसाच्या फडात आग लागून ऊस खाक झाला होता.
आठवड्यात घडलेली ही तीसरी घटना आहे. शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, क्षेत्र जास्त असल्याने आग विझविण्यासाठी अडथळा येत होता. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हायवेच्या पूर्वेला ब्राम्हणपुरी मळ्यामध्ये अचानक आग लागून अमित कुलकर्णी, तानाजी शिंदे, शशीकांत फुटाणे, शंकर माळी यांच्या ६ एकर ऊसाला आग लागून अंदाजे १२ लाखाचे नुकसान झाले असलेचे अमित कुलकर्णी यांनी सांगीतले. तसेच कासेगाव येथील गौड भाग व तोडकर या भागात मोठ्या प्रमाणात ऊसशेती आहे. नदीकडेचा भाग असल्यामुळे ऊसशेती चांगली फुललेली आहे. काही शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याकडे गेले आहेत. काही शेतकऱ्यांचा ऊस अजून जाणे बाकी आहे. एका शेतकऱ्याचे शेडही जळाले. हनुमंत पाटील, प्रशांत पाटील, विलास गावडे, कुमार गावडे, भीमराव तोडकर, रोहित गावडे, प्रभाकर भांबुरे, शकुंतला तोडकर, केशव तोडकर, मनोज ठाणे, दिगंबर तोडकर, आप्पासो कापसे, सुनील कदम, अभिजित पाटील, शिवराम तोडकर, सुरेश तोडकर, दिनकर पाटील, मानसिंग दुकानदार, जितेंद्र तोडकर, भीमराव तोडकर, युवराज तोडकर यांच्या उसाचे नुकसान झाले आहे.