वार्ताहर / कास :
सातारा शहराला पाणी पुरवठा होणाऱया कास तलावाची उंची वाढविण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यात निधीअभावी काही महिने काम परत बंद करण्यात आले होते. निधी उपलब्ध झाल्याने आता कास धरणाच्या कामाला पुन्हा गती मिळाली आहे. मात्र, कास गावातील ग्रामस्थांनी हेच काम 11 फेब्रुवारीपासून बंद पाडणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तसे त्यांनी महसूल उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांना लेखी निवेदन देखील दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2001 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 11 नुसार 50 हेक्टरच्या वरती क्षेत्र संपादन झाले पाहिजे, परंतु इ.स. 1885 साली कास धरणामध्ये संपादन क्षेत्र 255 एकर व सन 1989 संपादन क्षेत्र 5 एकर तर सन 2013-14 मध्ये 35 एकर क्षेत्र संपादन होत आहे. म्हणजेच, 115 हेक्टर क्षेत्र संपादन झाले आहे. तिन्ही टप्प्यांमध्ये जमिनी संपादन करण्यात आलेल्या आहेत. कास धरण प्रकल्प वेगळा नसून एकच आहे. अशा वारंवार जमिनी संपादन केल्यास एक दिवस शेतकरी भूमिहीन होणार आणि हेच संबंधित अधिकारी म्हणणार तुम्ही पुनर्वसन कायद्यात बसत नाही, त्यामुळे धरणामध्ये बाधित होणाऱया खातेदारांना पुनर्वसन कायदा लागू करावा व बाधित खातेदारांच्या घरातील किमान एका व्यक्तीस सातारा नगरपालिकेत नोकरीला घ्यावे.।़ पाणीसाठा वाढल्याने जुना रस्ता धरणात जात असल्याने धरणाच्या सभोवताली रिंग रोडची नव्याने निर्मिती करण्यात यावी.ग्रामदैवत कासाई देवीचे मंदिर धरणाच्या बुडीत क्षेत्रात जात असल्याने त्याचे मूल्यांकन करून त्याची योग्य ती नुकसान भरपाई मिळावी.जेणेकरून नवीन मंदिराची निर्मिती करता येईल. मुलकी पड गट नं 70 मध्ये कास गावाच्या गावठाणासाठी मागणी केलेप्रमाणे जागा उपलब्ध करून मिळावी.सातारा ते कास बामणोली प्रजिमा 26 हा रस्ता जुना सर्व्हे केल्याप्रमाणे कास धरणाची उंची वाढविण्यापूर्वी तयार करावा.कास धरणामध्ये संपादन झालेल्या गट नं 72 मधील सांडव्या लगत मागणी केल्याप्रमाणे स्मशानभूमीसाठी जागा मिळावी.कास धरणातून कास गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वीज कनेक्शनची सोय करून मिळावी.शिक्षणासाठी व नोकरीसाठी पुनर्वसन दाखले मिळावेत. अशा मागण्याचे निवेदन वारंवार जिल्हाधिकारी सातारा व संबंधित खात्याचे अधिकारी यांना वेळोवेळी देऊन सुद्धा कोणत्याही खात्याने याची दखल न घेतल्याने आज पुन्हा एकदा सातारा महसूल उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचेकडे लेखी निवेदन दिले असून दि.11 जानेवारी पर्यंत यावर अजूनही काही तोडगा न निघाल्यास कास धरणाचे काम बंद करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा यावेळी कास ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.