शनिवारी पत्रकार व शिवसेना खासदार संजय राऊत यांची व भाजप नेते व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत ग्रँड हयात या सप्ततारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. दोघांनी एकत्र जेवण केले आणि अडीच-तीन तास चर्चा केली. या भेटीचे तर्कवितर्क लावून महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असे ढोल वाजू लागले आहेत. खरच ही भेट सहज होती की त्यामागे काही खलबत होते. नवे समीकरण होते हे हळूहळू स्पष्ट होईल. पण काही तरी शिजते आहे, गेले वर्षभर व सत्तास्थापनेच्यावेळी जी शिवसेना देवेंद्र फडणवीस यांचा फोन घेत नव्हती, संवाद ठेवत नव्हती त्या सेनेचे महत्त्वाचे नेते संजय राऊत हे फडणवीस यांच्यासोबत जेवण करतात यात अनेक अर्थ दडले आहेत. या भेटीतून आणि त्यापूर्वी एक आठवडा दिल्लीत संजय राऊत व भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यात झालेल्या चहापान व भेटीतून एक अर्थ निघतो आहे. भाजप व शिवसेना संवाद पुन्हा सुरू झाला आहे. दानवे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती व या भेटी अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना कर्जहमी व कृषी बिलांसाठी होत्या, असे सांगितले गेले. ते खरेही असेल कारण धोरण बदलून साखरसम्राटांना थकहमी देण्याचे ठरवले आहे. सर्वपक्षीय साखरसम्राट न्हाऊन निघणार आहेत. पण ही भेट इतकीच मर्यादित नसावी, तसेच राऊत व फडणवीस भेटीचे आहे. शनिवारी राऊत यांनी ग्रँड हयातमध्ये जमवलेली पंगत फडणवीस यांच्या नियोजित मुलाखतीची पूर्वतयारीसाठी होती असे दोघांकडून सांगितले, पण ती याच विषयापुरती नसणार हे स्पष्ट आहे. फडणवीस यांची ही नियोजित मुलाखत फिक्सिंग असणार आणि अटी, शर्ती व परिणाम डोळ्यासमोर ठेऊन त्याची रचना असणार असाही अर्थ निघतो. अलीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या व अंकात, सोशल मीडियावर आणि थेट प्रक्षेपणात गाजवल्या होत्या. आपण देवेंद्र फडणवीस, अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखती घेणार आहोत, असा मनोदय त्यांनी बोलून दाखवला होता आणि त्यानुसार फडणवीस यांची मुलाखत या आठ दहा दिवसात होणार आहे. या भेटीमागे वातावरण तापवणे, टीआरपी वाढवणे हा हेतूही असू शकतो. पण मी सामना वाचतही नाही म्हणणारे फडणवीस आणि फडणवीस यांचा फोनही न घेणारे व त्यांना, शहांना व भाजपला टीकेचे लक्ष्य करणारी शिवसेना व तिचे मुखपत्र सामना फडणवीस यांच्यावर इतके फिदा कसे हा औत्सुक्याचा विषय होणे गैर नाही. महाराष्ट्रात जे काही राजकीय चालू आहे त्यात वैचारिक सूत्र नाही हे ओघाने दिसतेच आहे. पण विचारांपेक्षा सत्ता मोठी असते याचा अनुभवही येतो आहे. राज्यात कोरोनाचा कहर आहे. मराठा आरक्षण विषय आहे. जोडीला सुशांतसिंह राजपूत आत्महत्या की हत्या आणि अमली पदार्थ सेवन, विक्री आदीने सिनेसृष्टीला घातलेला विळखा तप्त विषय बनला आहे. कंगनाने शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उडवलेली राड आणि राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची केलेली मागणी चर्चेचा विषय होती. भरीस भर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे बॉलिवूडच्या या प्रकरणात संशयाचे बोट दाखवले जात होते. भाजप नेते आम्ही हे तीन पक्षांचे सरकार पाडणार नाही, हे अंतर्विरोधानेच पडेल असे सांगत होते व आहेत. भाजप नेत्यांना शिवसेनेने काँग्रेसबरोबर केलेली हातमिळवणी आणि सावरकर यांचा काँग्रेसकडून झालेला अवमान गिळून गप्प बसण्याची भूमिका व नरेंद्र मोदी, शहा किंवा रा.स्व.संघ यांच्यावर ठाकरी भाषेतील शेलकी टीका जिव्हारी लागली आहे. साहजिकच भाजप नेते फडणवीस, दानवे हे राऊत व सामना यांना मुलाखत देत असले, एकत्र चहा जेवण करत असले तरी दोन्ही पक्ष युती करतील, सत्तेत एकत्र येतील असे वाटत नाही. पण राजकारणात सत्ता महत्त्वाची असते आणि राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो, काहीही होऊ शकते. मातोश्रीवर ‘बाबा मला वाचवा ’अशी हाक असेल तर या भेटीचा अर्थ निराळा असू शकतो आणि फडणवीसही सामनात जाऊन विरोधी नेते म्हणून सामना करू इच्छित असतील तर तोही त्यांचा वेगळा पैलू असू शकतो. भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता हवी आहे हे स्पष्ट आहे. आम्ही आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. सेनेसोबत युती केली नसती तर आम्ही सत्तेत असतो असे फडणवीस यांनी म्हटले आहे, तर भाजपने शब्द पाळला नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. या सर्व गोष्टीवर मुलाखतीत चर्चा होईल, फडणवीस यांचेवर भाजपने बिहारची निवडणूक जबाबदारी सोपवली आहे. हे सगळे मुद्दे मुलाखतीत येतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर हे शिवसेनेचे सरकार आहे असे म्हणत आहेत. शरद पवारांनी या भेटी व बॉलिवूड रॅकेटबद्दल सोईचे मौन स्वीकारले आहे. नाराज नेते नाथाभाऊ खडसे यांना चुचकारण्याचे काम त्यांनी व राष्ट्रवादीने सुरू ठेवले आहे. तूर्त काँग्रेस वा शिवसेना, राष्ट्रवादीकडून लगोलग काडीमोड, नवे समीकरण होईल अशी शक्यता कमी आहे. पण भाजप महाराष्ट्रात अन्य पक्षाचा मोठा लचका तोडून सत्ताप्राप्तीवर लक्ष ठेऊन आहे हे लपून राहिले नाही. कोरोनाचा महाराष्ट्र हॉटस्पॉट झाला आहे अशावेळी राजकारण न करता समाजकारण गरजेचे आहे, पण राज्यात एकपक्षीय सत्ता नसल्याने आणि सुसंवाद नसल्याने सत्तेची नवी गणिते जमवण्यावर भर आहे. शरद पवार आणि संजय राऊत यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला आणि भेटीगाठींना महत्त्व असते. संजय राऊत-फडणवीस भेटीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस कसा पवित्रा घेतात हे बघावे लागेल.
Previous Articleकाय करील साबण
Next Article आजचे भविष्य सोमवार दि. 28 सप्टेंबर 2020
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.