प्रतिनिधी/ मडगाव
जिल्हा नियोजन समिती तर्फे काल मंगळवारी मडगाव येथील जिल्हा अधिकाऱयांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. ही बैठक या पूर्वी 2014 साली घेण्यात आली होती. आज चार वर्षानंतर जिल्हा पंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपण्यात आला असल्याने उगाच लोकांना फसविण्यासाठी बैठक घेऊ नये अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई बैठकीत केली व बैठक अर्ध्यावरच सोडली.
विजय सरदेसाई यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना मंत्री निलेश काब्राल म्हणाले, प्रत्येक राजकारणी आपल्या स्वार्थासाठी सरकारवर दबाव आणण्याचे काम करीत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समीतीची बैठक, ज्या मुद्यावर बोलावण्यात आली होती. त्या मुद्यावर त्यांनी बोलण्याची गरज होती. ही बैठक दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे सदस्य नवनाथ नाईक यांनी बोलविली होती. जो पर्यंत नवीन अध्यक्ष निवडण्यात येत नाही, तो पर्यंत त्याला बैठक घेण्याचा अधिकार असतो. तसेच ही बैठक घेण्याची जिल्हा पंचायत निवडणुकीचा कोणताही हेतू नाही. आज पर्यंत दक्षिण गोव्यातील 88 पंचायतीपैकी 47 पंचायतीने आपला नियोजन आराखडा तयार करुन पाठविलेला आहे.
कर्मचाऱया अभावी चार वर्षापासून बैठक घेतली नव्हती
या बैठकीत कर्मचारी कमी असल्या कारणाने बैठक घेण्यात अडथळा येत असल्याचे सांगून गेली चार वर्षापासून बैठक घेण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून ही समिती जिल्हा पातळीवर असल्याने गट विकास अधिकारी, नगरपालिका व जिल्हा परिषदच्या कर्मचाऱयांना बोलवून पंचायत पातळीवर तयार केलेला आराखडय़ाचा अभ्यास करुन तो पुढे नेण्याचे काम करण्यात येईल असे वीजमंत्री श्री. काब्राल यांनी सांगितले.
विधानसभेत जिल्हा पंचायतीसंदर्भात आवाज उठविला जात नाही
बैठक घेऊन कोणताही फायदा नाही. त्यासाठी कर्मचारी व अनुदानाची गरज आहे. जिल्हा पंचायत भाजपची असली तर यात सर्व पक्षाचे नेते आहेत. जेव्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते, तेव्हा सुद्धा याच मागण्या होत्या. राज्याचा विकास करण्याकरिता आमदार, जिल्हा पंचायत, सरपंच व पंच सदस्य या सर्वांना लोकांनी निवडून दिलेले आहे. तेव्हा सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. राजकीय पक्ष जिल्हा पंचायत सदस्यांना जास्त अधिकार मिळावे यासाठी तयार आहे. पण विधानसभेत जिल्हा पंचायत सदस्यांकरिता आवाज उठविण्यासाठी एकही नेता नाही. काही नेते जिल्हा पंचायत सदस्य होऊन आमदार झालेले आहेत. पण ते सुद्धा आमच्यासाठी आवाज उठवत नाही अशी खंत दक्षिण गोवा जिल्हा पंचायत सदस्य नवनाथ नाईक यांनी व्यक्त केली.
सरकार पाठिंबा देणाऱया उमेदवारांना निवडून देऊ नका
आज जिल्हा नियोजन समितीतर्फे घेण्यात आलेली बैठक राज्यातील जनतेला फसविण्यासाठी घेण्यात आली होती. ही बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची गरज होती. पण ती झाली नाही. जिल्हा नियोजन समितीसाठी गेली 4 वर्षे जिल्हा पंचायत सदस्यांनी काहीही केलेले नाही. ही बैठक जिल्हा पंचायतीची निवडणूक होणार असल्याने घेण्यात आली आहे. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होणे योग्य नाही. तेव्हा यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत राज्यातील जनतेने ज्या उमेदवाराला सरकार पाठिंबा देतील, त्या उमेदवाराला निवडून आणू नये. जास्त करुन स्वतंत्रपणे लढणाऱया उमेदवाराला निवडून द्यावे. तेव्हाच जिल्हा नियोजन समिती योग्य प्रकारे काम करतील असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले.
आज भाजप जिल्हा पंचायत निवडणुकीत कोणते विषय घेऊन प्रचार करतील यावरही जनतेचे लक्ष असेल. कारण, निवडणूक लढविण्यासाठी आज त्यांच्याकडे कोणतेही मुद्ये राहिलेले नाही. त्यांनी राज्यातील जनतेला तसेच जिल्हा पंचायत व पंचसदस्यांना फसविण्याचे काम केलेले आहे. जिल्हा नियोजन समितीसाठी सरकारने कर्मचारी द्यावे यासाठी 2012मध्ये भाजपचे सरकार असताना पत्र लिहिलेले होते. पण अजून पर्यंत त्यांना सरकारने कर्मचारी दिलेले नाहे असे सरदेसाई यांनी सांगितले.
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की, दक्षिण गोव्यातील प्रत्येक पंचायतीने जिल्हा पंचायत समितीला आराखडा तयार करुन द्यायचा असतो. पण, काही पंचायतीने आराखडा तयार केलेला नाही. तेव्हा जी पंचायत आराखडा तयार करुन देत नाही, तेव्हा दक्षिण गोवा जिल्हा पंचायतच्या अध्यक्षांनी एक बैठक बोलविण्याचे काम करायला हवे होते पण ते केले नाही.
या बैठकीला सांगेचे आमदार प्रसाद गांवकर, मडगावच्या नगराध्यक्षा पूजा नाईक, कुंकळळी व केपे पालिकेचे नगरसेवक तसेच जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप, जयदीप शिरोडकर, नेली रॉड्रीक्स, उल्हास तुयेकर व इतरांची उपस्थिती होती.