वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम, रब्बी हंगामावरही संकट
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहे. थंड, उष्ण तर कधी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरासह ग्रामीण भागात रविवारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागात पावसाचा शिडकावा झाला. तर काही भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे याचा आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत.
शहरासह ग्रामीण भागातील काकती, होनगा, कडोली, हंदिगनूर, मण्णीकेरी, केदनूर, उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, गोजगा, आंबेवाडी, अलतगा, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, कुरीहाळ, कट्टणभावी, बंबरगे आदी भागात पावसाचा शिडकावा झाला. जानेवारीतच काही भागात पावसाचा शिडकावा झाल्याने शेतकऱयांमधून चिंता व्यक्त होत आहे. आधीच बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. रविवारी काही भागात पावसाचा शिडकावा झाल्याने शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे.
यंदा अवकाळी पाऊस अतिप्रमाणात झाल्याने पिकांना फटका बसला आहे. त्यातच वारंवार वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर परिणाम होत आहे. रब्बी हंगामात बळीराजाने मसुर, वाटाणे, हरभरा, ज्वारी याबरोबरच बटाटा लागवड केली आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे कडधान्याबरोबर बटाटा व भाजीपाल्यावरदेखील मोठा परिणाम होत आहे. आता पावसाच्या शिडकाव्यामुळे कडधान्यांबरोबर इतर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्मयता आहे.