प्रतिनिधी /बेळगाव
विकेंड कर्फ्यु, लॉकडाऊन या शब्दांची पालकांनी प्रचंड धास्ती घेतली आहे. मुलांना शाळेत पाठवावे की न पाठवावे हा त्यांच्या समोर कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सरकारने मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिली असूनही काही शाळांमध्ये सॅनिटायझेशनसह कोरोना नियमांचे पालन करण्याचे प्रमाण कमी झाल्याने पालकांमध्ये कमालिची चिंता पसरली आहे. दुदैव म्हणजे पालकांनी विचारणा केल्यानंतरही शाळा व्यवस्थापकांकडून उध्दट उत्तरे मिळत असल्याने पालक संतप्तही झाले आहेत.
शाळा सुरू झाल्या तरी पालकांमध्ये मुलांच्या आरोग्याच्या प्रश्नी पालक धास्तावले आहेत. शाळेत न पाठविल्यास अभ्यासक्रम चुकतो. शाळेत पाठविल्यास आरोग्याचा प्रश्न भेडसावतो. अशा केंडीत पालक सापडले असताना शाळांकडून त्यांना सहकार्याची आणि कोविड-19 च्या नियमांच्या पालनांची अपेक्षा आहे. शाळा सुरू करतानाच शिक्षण खात्याने मास्क, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर या नियमांचे पालन बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु दुर्दैवाने बहुसंख्या शाळांना या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
शाळांमध्ये सॅनिटायझेशन केले जात नसल्याबद्दल काही पालकांनी शुक्रवारी शाळा चालकांना त्याबाबत धारेवर धरले. तेंव्हा मनपातर्फे सॅनिटायझेशन केले जात नाही, असे हास्यास्पद उत्तर मिळाले. परंतु शाळांनी आपल्या अधिकारांमध्ये शाळा व्यवस्थापनातर्फे सॅनिटायझेन करणे आवश्यक आहे. तथापि, शाळा जबाबदारी झटकत असल्याने पालक मात्र गांगरुन गेले आहेत.
एखाद्या मुलाला सर्दी, पडसे किंवा ताप आला तरी शक्यतो त्याची वाच्यता होवू नये याची काळजी पालक घेत आहेत. मात्र अशा मुलाला शाळेत न पाठविणे हितकारक ठरणार आहे. तथापि, तशा मुलांसाठी अभ्यासक्रमाचा तपशील मोबाईलव्दारे पाठवून देण्याची विनंती सुध्दा पालकांनी केली. मात्र त्यालाही प्राचार्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
शाळांना पुन्हा सूचना देवू
याबाबत शिक्षणाधिकाऱयांशी संपर्क करता शाळा व्यवस्थापनांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सॅनिटायझेशन करणे अत्यावश्यक आहे. शाळांना सतत सूचना देण्याची खरे तर गरज नाही. शाळांनी आपल्या जबाबदारीवर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तथापि, सर्व शाळांना आपण पुन्हा एकदा सूचना देवू. दरम्यान एखाद्या शाळेमध्ये नियमांचे पालन होत नसल्यास पालकांनी आपल्याशी संपर्क साधावा.
– शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड
मुलांचे आरोग्य महत्त्वाचे
दरम्यान ज्ञान प्रबोधन शाळेमध्ये केवळ मुलांचे नव्हे तर दप्तरांचेही सॅनिटायझेशन केले जाते. थर्मल स्क्रिनिंगही केले जाते. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिने नियमांचे पालन करणे ही जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वच शाळांनी ही काळजी घ्यावी.
– गोविंद वेलिंग, प्रशासक