‘नमस्ते मॅडम, मी मेघा. गेले काही दिवस मला खूप त्रास होतो आहे. जराही स्वस्थता नाही. हल्ली ना, खूप थकल्यासारखं होतं. तसं पहायला गेलं तर आता घरात आम्ही दोघेच. मुलं शिक्षणाला बाहेर गेली. घरात फारसे कामही नसते. पण तरीही अनेकदा मरगळ जाणवते. हे सारं विचारांमुळे होत असेल का हो? माझ्या मनामध्ये सतत विचारांचं काहूर सुरू असतं. एक विचार आला की पाठोपाठ दुसरा विचार येतो मग तिसरा विचार येतो मन सारखं विचारामध्येच भरकटत असतं. मुलांचं शिक्षण नीट होईल ना? ती वेडीवाकडी तर वागणार नाहीत ना? सगळय़ांच्या तब्बेती नीट राहतील ना.. मी एकटीच पडले तर. काहीवेळा तर कसलेही विचार येतात. ते एकाच संदर्भात असतात असेही नाही. जेवढे विचार थांबवायचा प्रयत्न करेन तेवढे जास्त विचार येतात. मन नुसतं धावत असतं. अलीकडे मला ते खूपच जाणवायला लागले आहे. सारखं वाटतं आपण विचारातच अडकलेले असतो की काय? कधीतरी उदास वाटतं, कंटाळा येतो, कधी कधी खूप थकवा जाणवतो. खूप प्रयत्न केला मॅडम हे विचार थांबविण्याचा परंतु काही केल्या थांबवता येत नाही. उलट अधिकच विचार येतात. एकेकदा वाटतं डोकं फुटेल की काय आपलं. काय करावं सुचत नाही.’
विचारांचे काहुर आणि धावणारे मन अशी सारी व्यथा मेघा माझ्यासमोर मांडत होती. मला एक संस्कृत श्लोक आणि त्या श्लोकासंदर्भातली एक गोष्ट आठवली.
मा मनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरुत् । मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश चञ्चला: ।। मन, मधुप (भुंगा), मेघ, मद्यपी, मर्कट, मरुत् (वारा), माशी मत्कुण (ढेकूण), मत्स्य, लक्ष्मी असे दहा चंचल ‘म’कार सांगितले आहेत.
एकदा एक विद्वान राजाच्या दरबारात जातात आणि एका संदर्भात हा श्लोक उलगडून सांगतात. राजा म्हणतो, ‘तुम्ही नऊ चंचल गोष्टी सांगितल्या परंतु एक मकार सांगितला नाही.’ ते म्हणतात, ‘खरे आहे राजन परंतु त्याचे कारण असे आहे की बाकी सर्व गोष्टी चंचल असल्या तरी कदाचित त्या एका दिशेला तरी धावतील परंतु ‘मन’ हे असे आहे की एकाचवेळी ते दहा दिशाना धाव घेते.
मनाच्या बाबतीत अगदी पटण्यासारखी अशीच ही गोष्ट. परंतु ते जर असेच दहा दिशांना धावत राहिले तर सारेच अवघड होऊन बसेल. खरंतर विचार करणे हे आपल्या मेंदूचे कामच आहे परंतु जसे कॉम्प्युटर वा मोबाईलमधे अनेक फाईल्स एकदम ओपन होत राहिल्या तर तो हँग होईल तसेच सतत विचारांची मालिका सुरुच राहिली अर्थात मेंदूमधे एकाचवेळी अनेक फाईल्स ओपन होऊ लागल्या तर मग आपलीही स्थिती तशीच होते. कॉम्प्युटरवर एखादे काम करत असताना एखादी विंडो पॉपअप झाली तर आपण ती मिनीमाईझ करतो वा आवश्यक नसेल तर क्लोज करतो तसेच विचारांच्या बाबतीत हे तंत्र अवगत करणे गरजेचे आहे आणि माईंडफुलनेसच्या सरावाने ते शक्मय आहे. अनेकदा आपण विचार झटकण्याचा किंवा तो येऊच नये म्हणून तो दडपण्याचा प्रयत्न करतो आणि मग सुरुवातीला मेघाने म्हटल्याप्रमाणे दुप्पट विचार येऊ लागतात. त्यामुळे विचारांना टाळण्यापेक्षा ते साक्षीभावाने न्याहाळण्याचे तंत्र अवगत करायला हवे. अन्यथा ‘विचाराचे रवंथ’ सुरूच राहते आणि दमणूक जाणवू लागते. वरती म्हटल्याप्रमाणे विचार करणे हे आपल्या मेंदूचे कामच आहे परंतु मेंदूतील ‘डी फॉल्ट मोड नेटवर्क’ हा भाग सतत काम करत राहिला तर मेंदू थकतो. शारीरिक श्रम नसले तरी थकवा जाणवण्याचे बऱयाचवेळा हेही एक कारण असू शकते. आपण काहीही काम न करता बसलेले असतानादेखील मेंदूतील जो भाग काम करत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’ असे नाव दिले. खरंतर संगणक युगातील आपल्याला ‘डी फॉल्ट मोड’ हा शब्द संगणकाच्याबाबतीत सुपरिचित आहे. संगणक सुरू केला की त्याच स्थितीत सुरू होतो. तसेच मेंदू अर्थात आपला सुपर कॉम्प्युटर! झोपेमधून जागे होताक्षणी मेंदूतील हा भाग लगेच आपले काम सुरू करतो. त्यामुळे जाग येताक्षणी लगेच आपल्या विचारांना सुरुवात होते. अर्थात झोपेतही ज्यावेळी हा भाग सक्रिय असतो त्यावेळी आपल्याला स्वप्ने पडतात. आधुनिक संशोधनानुसार मेंदूतील या भागामुळे आपण अमूर्त विचार करू शकतो. याच्या सक्रियतेमुळेच आपल्याला विविध कल्पना सुचतात. क्रिएटीव्हीटीसाठी या भागाचे सक्रिय असणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु या भागाला अजिबातच विश्रांती नसेल किंवा ओव्हर ऍक्टिव्ह डी फॉल्ट मोड नेटवर्क हे अस्वस्थता, चिंता, नैराश्य, निद्रानाश याचे मुख्य कारण असू शकते.
ओव्हर ऍक्टिव्ह डी फॉल्ट मोडमुळे एकाग्रता साधण्यातही अडथळा येतो. नीट लक्ष देता न आल्याने त्या कृतीचा आनंद घेता येत नाही. आकलन होण्यावरही त्याचा परिणाम होतो. उदा. समजा तुम्ही हा लेख वाचत आहात परंतु डी फॉल्ट नेटवर्कच्या अति सक्रियतेमुळे तीन चार ओळी वाचताक्षणी मन दुसरीकडे भरकटेल, वेगवेगळे विचार येतील, नीट वाचले जाणार नाही आणि लक्ष केंद्रीत न करता आल्याने लिहिलेल्या विषयाचे आकलनही होणार नाही. म्हणजेच ‘लक्ष देण्याची क्षमता’ पर्यायाने आकलन यावरही याचा परिणाम होतो. तसेच मेंदूच्या या भागाला विश्रांती न देताच सतत त्या भागाला काम देत असू तर साहजिकच ताण, थकवा जाणवू लागेल. म्हणूनच अधेमधे या भागाला विश्रांती देणे गरजेचे आहे.
ज्यावेळी आपण लक्षपूर्वक, सजगतेने काही हालचाली करतो त्यावेळी आपल्या डी फॉल्ट मोड नेटवर्कला आराम मिळतो. डीफॉल्ट मोड नेटवर्क मोड नेटवर्कसारखाच अजून दुसरा भाग आपल्या मेंदूत कार्यरत असतो त्याला ‘टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क’ असे म्हटले जाते परंतु हे दोन्ही भाग एकाच वेळी सक्रिय होऊ शकत नाहीत.
यामुळे जेव्हा टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क हा भाग ज्यावेळी सक्रिय होतो त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला आराम मिळतो. आपण जेव्हा एखादी कृती लक्षपूर्वक करत असतो, शारीरिक हालचाली करतो त्यावेळी टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क हा भाग सक्रिय होत असतो अर्थात वेगवेगळय़ा टास्कसाठी हे नेटवर्क वेगवेगळे असते. यांत्रिकतेने कृती केली गेली तर डिफॉल्ट मोडला आराम मिळत नाही. पूर्वी ज्यावेळी श्रमाची कामे केली जायची त्यावेळी तिथेच लक्ष द्यावे लागायचे उदा. विहिरीतून हात रहाटाने पाणी काढताना लक्ष जाणीवपूर्वक कृतीवरच द्यायला लागायचे परंतु आता पाणी टाकीत नेण्याचे काम विजेचा पंप करतो आणि टाकी भरते का पहात असताना आपले विचारांचे बटण मात्र ऑनच राहते.
मानवाने खूप प्रगती केली. आपल्या बुद्धीच्या बळावर विविध शोध लावले. भौतिक सुखसुविधांनी युक्त असे जीवन आपण जगू लागलो. अर्थात उपलब्ध आधुनिक साधनांचा लाभ घ्यायलाच हवा परंतु तो घेत असताना या गोष्टींचेही भान हवे. तसेच बौद्धिक कामे करत असतानाही डिफॉल्ट मोडला आराम देणेही गरजेचे आहे. डी फॉल्ट मोड नेटवर्कची अति सक्रियता किंवा त्याला अजिबात आराम न देण्यामुळेच श्रमजीवी वर्गाच्या तुलनेत बुद्धिजीवी वर्गामध्ये ताणतणाव, चिंता, अस्वस्थता, नैराश्य याचे प्रमाण तुलनेने अधिक दिसते.
माईंडफुलनेस अर्थात सजगतेच्या तंत्रानी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्कला आराम देता येतो. ब्रेथ अवेअरनेसने ते शक्मय होऊ शकते. परंतु त्यासाठी माईंडफुल असणे म्हणजे काय हे समजून घेणे आणि सजगतेचे तंत्र अवगत करणे गरजेचे आहे.
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583