पुढील हंगामातही केएल राहुल-कुंबळेलाच पसंती!
किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ यंदा प्ले-ऑफपूर्वीच गारद झाला असला तरी सध्या त्यांनी पुढील हंगामाच्या दृष्टीने आपली तयारी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल व अनिल कुंबळे ही कर्णधार-प्रशिक्षकाची जोडी पुढील हंगामातही कायम राहू शकते. या संघाच्या फ्रँचायझींनीच यासाठी पुढाकार घेतला आहे.
पुढील आयपीएल स्पर्धा केवळ सहा महिन्याच्या आतच होणार आहे. त्यामुळे, तयारीसाठी नेहमीइतका कालावधी निश्चितच मिळणार नाही. त्या अनुषंगाने विविध संघांना रणनीती निश्चित करण्यासाठी लगबग करावी लागणार आहे.
केएल राहुलने या हंगामात प्रथमच संघाचे नेतृत्व केले. शिवाय, फलंदाजीत जोरदार कामगिरी देखील साकारली. त्याने 55.83 च्या सरासरीने 670 धावांची आतषबाजी केली. या प्रँचायझीसाठी कुंबळे यांनी प्रथमच प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
वास्तविक, पंजाबची लाईनअप यापूर्वी स्थिरस्थावर कधीच नव्हती. पण, यंदा संघ म्हणून त्यांची बरीच जडणघडण झाली आहे. मयांक अगरवाल, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, ख्रिस गेल व रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग यांच्यासारखे युवा व अनुभवी खेळाडू सातत्याने संघात राहिले. यापैकी ख्रिस गेलला पहिल्या टप्प्यातील काही सलग सामन्यात अंतिम संघातून खेळता आले नाही. पण, उर्वरित टप्प्यात त्याने मिळालेल्या संधीचे पुरेपूर सोने केले.
मध्यफळी व गोलंदाजी लाईनअपमध्ये बऱयाच त्रुटी होत्या. त्या व्यवस्थापनाला दूर करायच्या होत्या. त्यानुसार देखील यंदा बरेच प्रयत्न झाले आहेत आणि संघव्यवस्थापन त्यावर खुश असल्याचे संकेत आहेत.
‘संघमालक विद्यमान कर्णधार व प्रशिक्षकांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. राहुल फलंदाजीत उत्तम योगदान देण्यात यशस्वी ठरला आणि विशेषतः दुसऱया टप्प्यात तो उसळून वर आला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शॉर्ट रन मोजली गेली नसती तर पंजाबचा संघ प्ले-ऑफमध्ये देखील पोहोचू शकला असता. पण, संघाची जडणघडण उत्तम झाली, हे यंदाचे फलित आहे. मध्यफळीत पॉवर हिटर फलंदाजाची गरज होती. त्या दृष्टीने देखील प्रयत्न झाले. शमीला साथ देऊ शकणारा जागतिक दर्जाचा गोलंदाज आवश्यक आहे. यावर पुढील कालावधीत भर दिला जाऊ शकेल’, असे सूत्राने नमूद केले. यंदा पंजाब संघाची सुरुवात खूपच खराब स्वरुपाची झाली होती. पंजाबला पहिल्या 7 पैकी 6 सामन्यात पराभव स्वीकारावे लागले होते. पण, नंतर त्यांनी सलग 5 सामने जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. केवळ शेवटच्या साखळी फेरीतील चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध लढतीतील पराभवामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. पंजाबने यापूर्वी 2014 मध्ये प्ले-ऑफ गाठली. पण, त्यानंतर सातत्याने ते साखळी फेरीतच गारद होत आले आहेत.