एखादी गोष्ट समोरच्याला कितीही समजावून सांगितली तरी त्याला जर ती समजत नसेल, त्याच्या वागण्यात फरक होत नसेल, तर ‘मूर्खापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता!’ ही म्हण त्याला ऐकवली जाते. याचाच अर्थ काही वेळा आपण दुसऱयाच्या भल्यासाठी, चांगल्या हेतूने त्याच्याशी बोलतो, पण ते निरर्थक ठरते. 12 वर्षे रामायण ऐकून ‘रामाची सीता कोण?’ असे निरर्थक प्रश्न विचारणारेही भेटतात. असे निरर्थकत्व स्पष्ट करणारी अनेक सुभाषिते संस्कृतमध्ये आहेत. किं करिष्यन्ति वक्तारः श्रोता यत्र न वर्तते। नग्नक्षपणके देशे रजकः किं करिष्यति।। अर्थः-जिथे (चांगले) श्रोतेच नसतील, तिथे (उत्तम) वक्ते काय करतील? ज्याप्रमाणे विवस्त्र (वस्त्र परिधान न करणाऱयांच्या) राहणाऱयांच्या देशात परीट (धोबी) तरी काय करील? आपल्याकडे ‘दैव देते नि कर्म नेते’ अशीही म्हण आहे. म्हणजेच माणसाला वेगवेगळय़ा स्वरूपात कितीतरी संधी समोर येतात. पण त्या संधीचा फायदा उठवण्यात माणसे अपयशी ठरतात. संधी वाया घालवतात. पण दुसऱयांनी त्या संधीचा लाभ उठवला की मग त्यांना पश्चाताप होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणजेच त्याची तेवढी कुवतच नसते, पात्रता नसते. त्याचप्रमाणे उत्तम वक्ता समोर काय बोलतो हे जर लक्ष देऊन श्रोते ऐकत नसतील, त्यांचे मन इतरत्र भरकटत असेल, तरी केवळ शरीराने उपस्थित असलेल्यांना त्या वक्त्याच्या भाषणाचा काही उपयोग नसतो. आणखी एक सुभाषित पाहू. पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम्। कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तदद्धनम्।। अर्थः- पुस्तकात असलेली विद्या, दुसऱयाच्या हाती गेलेले धन, कठीण प्रसंग आला असता जर उपयोगी पडत नसेल, तर ती विद्या नव्हे, ते धन नव्हे. म्हणजे पुस्तकातल्या विद्येचा आपल्याला व्यवहारात उपयोग करता येत नसेल आणि आपले धन जर आपल्याला स्वतःकडे सुरक्षित ठेवता येत नसेल, तर वेळप्रसंगी ते आपल्या कामी येत नाही. उदा. पुस्तकात पोहण्याच्या कलेविषयी माहिती वाचली आहे, पण प्रत्यक्ष पोहायला शिकलोच नाही, तर कर्मधर्मसंयोगाने पाण्यात बुडायची वेळ आली तर नुसत्या पुस्तकी ज्ञानाचा काही उपयोग नाही. ते निरर्थक आहे. तो माणूस पाण्यात बुडणारच. म्हणूनच बुद्धीचा, ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात वापर करायला शिकले पाहिजे. नाहीतर ते निरर्थक ठरते. संस्कृत कवींनी अशी निरर्थकत्व कोणकोणत्या गोष्टींमध्ये आहे हे सांगणारी असंख्य सुभाषिते लिहिली आहेत. म्हणून माणसाने अर्थपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.
थोडे संस्कृत शिकूया?
इत:-इथून, ततः-तिथून, नंतर, कुतः-कुठून ,इतस्ततः-इकडे तिकडे, कुत्र-कुठे
पुत्रः-एतत् लोकयानम् कुतः आगतम्?… ही बस कुठून आली?
पिताः- मुंबईतः आगतम्। मुंबईहून आली.
पुत्रः- इतः कुत्र गच्छति? इथून कुठे जाणार?
पिता:- इतः देवगडम् गच्छति। इथून देवगडला जाते.
पुत्र:-ततः कदा आगमिष्यति? तिथून कधी येणार?
पिता:-ततः श्वः आगमिष्यति। तिथून उद्या येईल.
पुत्रः- एते जनाः इतस्ततः सञ्चरन्ति। हे लोक इकडेतिकडे फिरत आहेत.