कोरोनाने सगळ्या जगाला घाबरवून सोडले आहे. फुप्फुसाशी निगडीत आजार असलेल्या रूग्णांबरोबर कोरोना संसर्गाचा अधिक धोका हा मुत्रपिंडाचा आजार असलेल्या व्यक्तींना देखील आहे.
लान्सेट या वैद्यकीय संशोधनाशी निगडीत पत्रिकेमध्ये कोरोनाच्या आजाराविषयी एक नवा खुलासा देण्यात आला आहे. त्यानुसार जगभरातच कोरोना संसर्ग झाल्याने मूत्रपिंडाशी संबंधित समस्या निर्माण होणार्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी ने दिलेल्या अहवालात किडनी म्हणजेच मुत्रपिंडाशी निगडीत समस्या येत असल्याचा उल्लेख केला आहे.
मुत्रपिंडाशी निगडीत आजारांमध्ये गंभीर किंवा तीव्र मूत्रपिंड इजा आणि मूत्रपिंड निकामी होणे या समस्या प्रामुख्याने दिसून येत आहेत.
कोव्हिड 19 चा संसर्ग झालेल्या
सुमारे 15 टक्के रूग्णांमध्ये ऍक्युट किंवा तीव्र मूत्रपिंडाची इजा होत असल्याचे आढळले आहे. त्यातूनच ही गोष्ट लक्षात आली की मूत्रपिंडावर कोरोना विषाणूचा तीव्र हल्ला होतो आहे.
कोरोना विषाणू प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे मुत्रपिंडावर परिणाम करतो. अमेरिकन जर्नल ऑफ किडनी डिसीज यांच्या नुसार, कोरोनाच्या संसर्गाच्या विळख्यात सापडलेले आयसीयू मध्ये दाखल असलेल्या रूग्णांपैकी 27 टक्के रूग्णांना मूत्रपिंड निकामी होण्याच्या स्थितीला सामोरे जावे लागले.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वात पहिली गोष्ट होते ती म्हणजे
फुफ्फुसांवर प्रभाव पडतो. विषाणू संसर्गामुळे फुफ्फुसामध्ये द्रव पदार्थ भरतो आणि फुफ्फुसाला सूज येऊ लागते. त्यामुळे रूग्णाला निमोनिआ म्हणजे ऍक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेसला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो मग रूग्णाला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवावे लागते. अशा परिस्थितीत रूग्णाच्या शरीरातील रक्तपेशी शरीराच्या सर्व अवयवांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवू शकत नाहीत. त्यामुळे शरीर अवयव कमजोर पडू लागतात. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम
फुफ्फुसांवर होतो त्यानंतर सर्वाधिक परिणाम होतो तो मुत्रपिंडावर.
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करायचा असेल तर सर्वात उत्तम उपाय
आहे तो शरीराची प्रतिकारक्षमता उत्तम राखणे हाच. त्यासाठी योग्य पोषक आहार घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये सी जीवनसत्वाने युक्त पदार्थांचा समावेश असावा. लिंबू, संत्रे, मोसंबी याव्यतिरिक्त गाजर, पालक आणि पत्ताकोबी यांचा आहारात समावेश करा. या भाज्या प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करतात.
भाज्या बाजारातून आणल्यानंतर त्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. जेणेकरून भाज्यांवरील जीवाणू शरीरात प्रवेश करणार नाहीत.
हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. किंवा सॅनिटायझर वापरा. ससंर्गापासून बचाव करण्यासाठी नाक, तोंड हे फेसमास्कने झाकलेले असावे.
श्वास घेता न येणे, खोकला, ताप येणे, थकवा, अशक्तपणा जाणवणे ही काहीही लक्षणे दिसल्यास सावधगिरी बाळगत डॉक्टरांशी संपर्क साधावा. तपासणी करून घ्यावी. अशी कोणतीही लक्षणे अंगावर न काढता त्वरीत उपचार घ्यावेत. अन्यथा रूग्णाचा धोका वाढू शकतो.
मुख्य म्हणजे अशी लक्षणे वाटल्यास ती न लपवता वेळीच उपचार करून घ्यावेत. कोरोना हा
सर्वसामान्यांसाठीही धोकादायक आहेच परंतू मुत्रपिंडाचे आजार असलेल्या रूग्णांसाठी त्याचा धोका अधिक आहे. यामागची कारणे जाणून घेतली पाहिजेत आणि त्यापासून बचाव करण्यासाठीचे उपाय यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. जेणेकरून संसर्ग टाळणे शक्य होईल.