बळीराजाची धडपड : शिवाराच्या बांधांवर बांधाव्या लागताहेत काळय़ा-पांढऱया पट्टय़ा
वार्ताहर /किणये
किणये-कर्ले भागातील शेतकऱयांना शेती करणे अवघड बनले आहे. दरवर्षी या भागात गवी रेडय़ांचा कळप शेत-शिवारात प्रवेश करतात आणि हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त करतात. असे गेल्या पाच-सहा वर्षांपासून सत्र सुरूच आहे. यंदाही किणये भागातील काही शेतकऱयांना आपल्या शेताजवळ गवी रेडे निदर्शनास आल्यामुळे त्यांची झोपच उडाली आहे.
गवी रेडय़ांच्या भीतीपोटी शेती करणे मुश्कील बनले आहे, असे अनेक शेतकऱयांनी सांगितले आहे. गवी रेडय़ांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेतावरील बांधांवर काळय़ा व पांढऱया रंगाच्या पट्टय़ा बांधत आहेत. रब्बी हंगामातील जोंधळा पीक तसेच भाजीपाला पिकांचे अस्तित्व गवी रेडय़ांमुळे पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.
खरीप हंगामानंतर बहुतांश शेतकरी शेतात भाजीपाला पिके घेतात. किणये-कर्ले भागातील शेतकरी प्रामुख्याने बटाटा, मिरची, बिन्स, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी आदी भाजीपाला पिके घेतात. मात्र, दरवर्षी पीक-पाणी बहरून आल्यानंतर डोंगर भागातून गवी रेडय़ाचा कळप शिवारात प्रवेश करतोय आणि पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करतात.
यावर्षी काही शेतकऱयांनी जोंधळा, मिरची, कोबी, फ्लॉवर, बटाटा व इतर भाजीपाला पिके शेतात घेतलेली आहेत. या पिकांसाठी ते जीवाचं रान करीत आहेत. किणये डोंगर भागातून येणाऱया गवी रेडय़ांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. वनखात्याच्या अधिकाऱयांनी या भागात पाहणी करावी आणि गवी रेडय़ांपासून आमच्या पिकांचे नुकसान होणार नाही, याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.