पेठ वडगाव / प्रतिनिधी :
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्यावर जिल्हा प्रशासनाने परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची वाहनांची नोंद करून त्यांना टोकन पास देण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी दोनच व्यक्ती पास देण्याची प्रक्रिया करत आहेत. यामुळे किणी टोल नाक्यावर प्रवाशांना चार ते पाच तास पास साठी थांबून राहावे लागत आहे. सुमारे पाचशे लोक या ठिकाणी गाडीमध्ये व रस्त्यावर पास साठी थांबून आहेत. वाहनांच्या चार किलोमीटर रांगा लागल्या आहेत. विविध जिल्ह्यातून आलेल्या या लोकांचे एकत्र येण्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त आहे. या ठिकाणी थांबलेल्या प्रवाशातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. प्रवाशांची गैरसोय व धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी एक तात्काळ निर्णय घेणारा सक्षम अधिकारी नेमून या ठिकाणी तात्काळ आठ ते दहा टोकन पास टेबल सुरु करून येथील गैरसोय दूर करण्याची गरज आहे.
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दोन दिवसापासून अनेक जिल्ह्यातून नागरिक परवानगी काढून वैद्यकीय तपासणी करून रीतसर कोल्हापूर जिल्ह्यात येत आहे. या प्रवाशांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टोकन पास सुविधा उपलब्ध केली आहे. या ठिकाणी प्रवाशांची नोंद करून त्यांनी पुढे कोणत्या दवाखान्यात तपासणी करून घ्यावयाची या बाबत प्रवाशाना यावर लिहून दिले जाते. हा टोकन पास देताना पूर्वीचा इ पासच आहे का ? याची तपासणी करून टोकन पास दिले जात आहेत. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक वाहनातून जिह्यात व पुढे कर्नाटक येथे जाण्यासाठी येत आहेत. मात्र या ठिकाणी सुरु असलेल्या टोकन प्रक्रियेसाठी दोनच व्यक्ती काम करत असून किणी टोल नाक्यावर प्रवाशांची तोबा गर्दी होत आहे. या ठिकाणी वाहनांच्या सुमारे चार किलोमीटर रांगा लागल्या आहेत. वडगाव पोलीस या ठिकाणी बंदोबस्त पुरवून नागरिकांना अंतरावर थांबण्याच्या सूचना करत आहेत.
टोल नाक्यावर रात्रीपासून अनेकांना चार ते पाच तास थांबून हे पास मिळत नाहीत. या ठिकाणी अगोदरचा इ पास असेल तरच येथील टोकन पास दिला जातो लेखी पास असे तर त्या व्यक्तीला पास नाकारून तेथेच थांबवून ठेवले जाते. मेडिकल तपासणीसाठी निघालेल्या नागरिकांचीही अडवणूक होत आहे. अनेक वाहनात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे. या ठिकाणी निर्माण होत असलेल्या अनेक अशा तांत्रिक अडचणीवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचा सक्षम अधिकारी उपस्थित असणे गरजेचे आहे. तर या मार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यात येत असलेल्या प्रवाशांची संख्या पाहता येथील सर्वच टेबलवर कर्मचारी उपस्थित ठेवून आठ ते दहा टेबलवर लोक उपस्थित ठेवून ही प्रक्रिया गांभीर्याने राबविण्याची गरज आहे.
या ठिकाणी बाधित जिल्ह्यातून आलेले लोक सुमारे चार ते पाच थांबून रहात असून रस्त्यावर फिरण्याने अनेकजण एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. यामुळे या मध्ये दुर्दैवाने एखादा जरी कोरोना संक्रमित असला तरी खूप मोठा धोका प्रशासन पत्करत आहे. तर हा पोलीस प्रशासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने पुरविलेले कर्मचारी व नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची तक्रार या ठिकाणी प्रवाशी करत आहेत. जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करावी व प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी या ठिकाणी उपस्थित प्रवाशांनी केली.