मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी कित्तूर उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. रविवारी या उत्सवाचा समारोप होणार असून कित्तूर उत्सवात भाग घेवून मुख्यमंत्र्यांनी या उत्सवाबद्दलच्या गैरसमजुती व अंधश्रध्दा दूर केल्या आहेत.
शनिवारी दिवसभर कित्तूर परिसरात वेगवेगळे कार्यक्रम झाले. सायंकाळी मुख्य व्यासपीठावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले मुंबई-कर्नाटकाचे कित्तूर-कर्नाटक असे नामांतर करण्यात येणार आहे. आगामी मंत्रीमंडळ बैठकीत या संबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पालकमंत्री गोविंद कारजोळ, उद्योगमंत्री मुरगेश निराणी, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, विधानसभेचे उपसभापती आनंद मामणी, खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले, खासदार मंगला अंगडी, खासदार इराण्णा कडाडी, कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर, कित्तूर राजगुरू संस्थान मठाचे मडिवाळ राजयोगेंद्र स्वामीजी, कुडलसंगम लिंगायत पंचमसाली पिठाचे जगद्गुरू बसवजय मृत्यूंजय स्वामीजी, हरिहर येथील पंचमसाली जगद्गुरू वचनानंद स्वामीजी आदींसह अनेक लोकप्रतिनिधी, मठाधिश उपस्थित होते.