मच्छिमार संघटनेतर्फे संबंधित प्राधिकरणास निवेदने सादर
प्रतिनिधी / पणजी
किनारी विभाग व्यवस्थापन आराखडय़ाच्या मसुद्यास राज्यातील विविध मच्छिमार संघटनांनी विरोध दर्शविला असून त्यास आक्षेप घेणारी निवेदने संबंधित प्राधिकरणास सादर करण्यात आली आहेत. मसुदा रद्द करून नव्याने सुनावणी घ्यावी, आणि आराखडा पुन्हा तयार करावा, अशी त्यांची मागणी आहे.
‘गोयंचो एकवट’ आणि इतर मिळून सुमारे 8 मच्छिमार संघटनांनी सध्या तयार करण्यात आलेला आराखडा मसुदा चुकीचा असून सर्व नियम धाब्यावर बसवून तो केल्याचे म्हटले आहे. मसुद्यात मासेमारी गावे विभाग अधोरेखित केलेला नाही, पण बंदर मर्यादा (पोर्ट) ठरवण्यात आली आहे. भविष्यात ती मर्यादा मच्छिमार बांधवांसाठी धोकादायक ठरणार असून मुरगाव बंदरातील जागेत असणारी मच्छिमारांची घरे पाडली जातील, अशी भीती निवेदनातून प्रकट करण्यात आली आहे. मच्छिमारांना या मसुद्यात कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही म्हणून तो मसुदा मान्य नसल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. मसुद्यावर जरी सुनावणी घेण्यात आली ती चुकीची असून त्यासाठी असलेली मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवण्यात आली आहेत, असे निवेदनातून प्राधिकरणाच्या निदर्शनास आणले आहे.