कामगारनेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांचा आरोप : आयटकतर्फे बुधवारी पणजीत धरणे आंदोलन
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील तमाम कुशल, अकुशल कामगारांना किमान वेतन वाढवून द्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात येऊन सुद्धा स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत ती मागणी अडवून ठेवतात, असा आरोप आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सचिव ऍड. सुहास नाईक व प्रसन्न उट्टगी यांची उपस्थिती होती. किमान वेतनासंदर्भात पुढे बोलताना फोन्सेका यांनी दिल्ली, केरळ सारख्या राज्यांमध्ये कामगारांना किमान रोजंदारी 600 रुपये देण्यात येतात. तर गोव्यात केवळ 425 रुपये देण्यात येतात. त्यात वाढ करून किमान 750 रुपये देण्यात यावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. परंतु सरकारला त्यात स्वारस्य नाही. म्हणुनच आजपर्यंत या मागणीची पूर्तता होत नाही, असे ते म्हणाले.
राज्यात गत दोन वर्षात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 25 हजार कामगारांनी नोकरी गमावली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण करण्याची गरज आहे. परंतु सरकारचे धोरणच कामगारविरोधी असल्यामुळे बडय़ा उद्योजकांच्या फायद्याचाच ते जास्त विचार करतात, असे फोन्सेका म्हणाले.
एका बाजूने महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या किंमती रोज वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. परंतु या सरकारला कोणतेही सोयरसूतक नसल्यामुळेच महागाईवर नियंत्रण मिळविण्यात पूर्णपणे अपयश आले आहे.
राज्यातील खाणी सुरू करून खाण अवलंबितांना दिलासा द्यावा, अशी मागणीही आयटकने लावून धरली होती. परंतु गत 8 ते 10 वर्षात केवळ आश्वासना पलिकडे या सरकारने काहीच दिले नाही. निदान आतातरी खाण अवलंबितांचा विचार करून त्यांच्यासाठी एखादी योजना राबवावी, अशी मागणी फोन्सेका यांनी केली.
दरम्यान, सरकारच्या या कामगारविरोधी धोरणाचा निषेध म्हणून बुधवार दि. 25 रोजी सकाळी 10 वाजता आयटकतर्फे पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती फोन्सेका यांनी दिली.