केंद्र सरकारविरोधात शेतकऱयांचे 18 रोजी विश्वासघात आंदोलन
अगसगे
केंद्र सरकारने शेतकऱयांची माफी मागून शेतकऱयांच्या विरोधातील तीन कायदे वापस घेतले आहेत. तरी अद्याप किमान हमी भाव (एमएसपी) निश्चित करण्यासाठी कायद्यानुसार तज्ञ समिती नेमावी म्हणून संयुक्त किसान मोर्चाच्या आदेशानुसार शेतकरी विश्वासघात सप्ताह कार्यक्रम आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी शनिवारी एपीएमसीसमोर पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकारने दि. 19 नोव्हेंबर 2021 रोजी तीन कायदे मागे घेतले आहेत. परंतु, शेतकऱयांच्या कृषी मालाला किमान हमी भाव ठरविण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येत असून त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. यासाठी त्वरित किमान हमी भाव ठरविण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी म्हणून शेतकरी विश्वासघात सप्ताह आणि लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
दि. 11 ते 17 एप्रिलपर्यंत हे आंदोलन होणार आहे. शेतकऱयांच्या मालासाठी किमान दर ठरवावा, तज्ञ समिती नेमावी, बेकायदा उभारलेल्या जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करावा आणि केंद्र सरकारने तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले असले तरी राज्य सरकारने अद्याप ते तिन्ही कायदे मागे घेतलेले नाहीत. राज्य सरकारनेदेखील त्वरित ते तिन्ही कायदे मागे घेऊन राज्यात तज्ञ समिती नेमावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा यांच्या आदेशानुसार शेतकरी विश्वासघात सप्ताह आंदोलन करण्यात येत आहे. या शेतकरी विश्वासघात सप्ताहाचे उद्घाटन मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी म्हैसूर येथे होणार आहे आणि बुधवार दि. 13 एप्रिल व शनिवार दि. 16 एप्रिल रोजी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर आंदोलने करणार आहेत.
सोमवार दि. 18 रोजी राज्यातील सर्व शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी विश्वासघात सप्ताहाच्यावतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचे भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी पत्रकारांना सांगितले. तरी सर्व शेतकरी संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मोदगी यांनी केले आहे.