व्यापारी संघाची माहिती : जीवनावश्यक वस्तुंच्या व्यवसायाना दिलासा: काहींना लॉकडाऊनमधून वगळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊन 1 च्या कालावधीत विविध उद्योगधंद्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यात काही प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंच्या व्यवसायांना दिलासा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु लॉकडाऊन 1 मध्ये मात्र किरकोळ व्यवसायांना 3.15 लाख कोटीचे नुकसान झाल्याची माहिती द कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्स यांनी दिली आहे. हे जरी नुकसान होत असले तरी ते सरकारला समर्थन करत असल्याचे चित्रही आहे. कारण यामुळे लवकरात लवकर कोरोनाला हरविण्याची मोहिम राबविण्यात येत आहे.
पहिला लॉकडाऊन मंगळवारी 14 एप्रिल रोजी समाप्त होणार होता. त्याच दिवशी जनतेला संबोधीत करताना मोदींनी सदरचा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा केली आहे. तरी येत्या 20 एप्रिलपर्यंत या लॉकडाऊनमधून काही गोष्टीना वगळण्याचा विचार सरकार करणार असल्याचेही सांगितले आहे. परंतु यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. उदाः सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड आकारणी करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. तर प्रत्येक राज्य आपल्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन ही तत्वे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने लागू करु शकणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परिस्थितीनुसार काही व्यवसायांना सवलत दिली जाण्याबाबतही विचार चालवला जात आहे. लवकरच याबाबत धोरण स्पष्ट होईल.
40 टक्के व्यापारी कार्यरत
कोणत्याही प्ररकारची जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये यासाठी देशात 7 कोटी क्यावसायिकांपैकी 1.5 कोटी व्यापारी कमोडिटी व्यवसायाशी जोडलेले आहेत. परंतु यातील 40 टक्के जणांनी आपले काम सुरु ठेवले आहे. कारण वाहतूकीची साधने बंद असल्यामुळे मालाची देवाण-घेवाण करण्यात मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसऱया बाजूला 80 टक्के कर्मचारी हे आपापल्या घरी निघून गेले आहेत. सध्या फक्त 20 टक्के कर्मचाऱयांमार्फत काम चालू ठेवले असल्याचे क्यापारी संघाने सांगितले आहे.