अंबाबाई मंदिरासंदर्भात पुन्हा नव्याने संशोधन : विवेकानंद महाविद्यालय, देवस्थान समिती
संजीव खाडे/कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात उत्तरायणातील किरणोत्सव नुकताच पूर्ण झाला. विनाअडथळा प्रखर आणि तीव्रतेने यंदाचा किरणोत्सव झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वैद्यानिक दृष्टीकोनातून संशोधन करणाऱया विवेकानंद महाविद्यालयातील ‘इन्स्पायर’च्या विद्यार्थ्यांमधील कुतुहल वाढले आहे. दक्षिणायन आणि उत्तरायणातील किरणोत्सवाचा कालावधी यापूर्वी तीन दिवसांचा मानला जात होता. पण संशोधनातून तो पाच दिवसांचा असल्याचे सिद्ध झाले. आता हाच कालावधी सात दिवसांचा असू शकतो काय? यावरही विवेकानंदच्या ‘इन्स्पायर’चे विद्यार्थी देवस्थान समितीच्या सहकार्याने संशोधन करणार आहेत. त्यामुळे नवीन माहिती, नवे संशोधन पुढे येऊ शकते.
साडेतीन पीठापैकी एक असणाऱया अंबाबाई मंदिराची रचना, स्थापत्यकला, शिल्पकला आणि त्याचा निसर्गाशी जोडलेला संबंध यातून किरणोत्सवाचा अविष्कार प्रकटतो. गेल्या दहा बारा वर्षात विवेकानंद महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इन्स्पायर’चे विद्यार्थी देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने किरणोत्सवाचा अभ्यास करत आहेत. दरवर्षी ‘इन्स्पायर’च्या बॅचमधील विद्यार्थी बदलत जातात. त्यांना संशोधनाचा प्रकल्प म्हणून किरणोत्सव सोहळय़ाचा अभ्यास करण्याची संधी मिळते. गेल्या बारा वर्षात विविध बॅचमधील विद्यार्थ्यांनी किरणोत्सवाचे निरीक्षण, पाहणी शास्त्रीय, वैज्ञानिक मांडणीतून केल्यानंतर निष्कर्ष मांडले आहे. त्यातून नवे संशोधनही पुढे आले आहे.
दक्षिणायण, उत्तरायण कालखंडातील किरणोत्सवाचा कालावधीत वाढ
किरणोत्सवाच्या कालावधीत झालेल्या वाढीविषयी माहिती देताना डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले, सूर्याचे दक्षिणायन 21 किंवा 22 जूनला सुरू होते व तो शरदसंपातमधून अवष्टंभाकडे जात असताना पूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या 9, 10 व 11 तारखेला सूर्याची किरणे अंबाबाई देवीवरती विसावत होती व किरणोत्सव 3 दिवसांचा होत होता. पण अभ्यास केल्यानंतर नवीन निरीक्षणे, संशोधन पुढे आले. सूर्याच्या दक्षिणायन कालखंडामध्ये पूर्वीच्या 9, 10 व 11 तारखेबरोबरच 12 व 13 तारखेलादेखील सूर्यकिरणे अंबाबाई देवीच्या अंगावरती विसावून किरणोत्सव होत असतो. याचाच अर्थ सूर्याच्या दक्षिणायन कालखंडामध्ये किरणोत्सव दोन दिवस जास्त होतो. म्हणजेच तो 5 दिवसांचा असतो.
डॉ. कारंजकर म्हणाले, सूर्याचे उत्तरायण 21 किंवा 22 डिसेंबरपासून सुरू होते व सूर्य अवष्टंभाकडून वसंत संपात बिंदूकडे जात असताना पूर्वी जानेवारीच्या 31 व फेब्रुवारीच्या 1 व 2 तारखेला सूर्याची मावळतीची किरणे अनुक्रमे अंबाबाईच्या मूर्तीच्या चरणावरती, कमरेवरती व पूर्ण चेहऱयावरती पडतात व किरणोत्सव होत होता. परंतु या कालखंडामध्ये असे दिसून आले आहे की, सूर्याची किरणे ही पूर्वीच्या नियोजित तारखेच्या अगोदर दोन दिवस म्हणजे 29 व 30 तारखेलादेखील गर्भगृहामध्ये प्रवेश करून देवीवरती विसावत असतात. याचाच अर्थ असा की, सूर्याच्या उत्तरायण कालखंडामध्ये किरणोत्सव दोन दिवस आधी सुरू होऊन तो 5 दिवस चालतो.
…असा होतो किरणोत्सव
पश्चिमामुख असलेल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये किरणोत्सवाच्या काळात सूर्याची मावळती सोनेरी किरणे ही अनुक्रमे पश्चिमेकडील महाद्वार, गरूड मंडप, गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरठा, खजिना चौक, गर्भगृह व गर्भकुटी असा प्रवास करून अंबाबाईच्या मूर्तीवरती चरणस्पर्श, गुडघ्यापर्यंत, खांद्यापर्यंत, चेहऱयापर्यंत व किरीटावरती विसावतात व संपूर्ण अंबाबाई सोनेरी किरणांनी उजळून निघते.
यंदाच्या किरणोत्सवाची वैशिष्ठ्य़े
किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होण्यासाठी सूर्यकिरणांची तीव्रता ही गाभाऱयामध्ये 30 ते 40 लक्स एवढी अपेक्षित असते. एक लक्स म्हणजे एका मेणबत्तीने एक स्क्वेअर मीटर अंतरावरती दिलेला प्रकाश. यंदाच्या उत्तरायणातील किरणोत्सवाची वैशिष्टय़े म्हणजे गाभाऱयामध्ये किरणाची तीव्रता ही 73 लक्स पर्यंत मिळाली. किरणांची तीव्रता मोजण्यासाठी लक्स मीटरचा तर किरणांची दिशा बघण्याकरीता मॅग्नेटोमीटरचा वापर केला जातो.
तीन दिवसांचा किरणोत्सव पाच दिवसांचा झाला तसा तो सात दिवसांचाही होऊ शकतो काय? हे शोधण्यासाठी नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळय़ांसह भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीकोनातून अभ्यास, संशोधन केले जाणार आहे.
प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर
पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख
विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर.