निपाणी शहरात दुटप्पी धोरणाचा संताप
वार्ताहर/ निपाणी
निपाणी शहरात शासनाच्या आदेशानुसार कडक लॉकडाऊनची कार्यवाही करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्ग काळात घेतल्या घेतलेल्या या निर्णयाला नागरिकांतून प्रतिसादही मिळत आहे. संसर्गाच्या भीतीने नागरिक घरात थांबू लागले आहेत. सकाळी 7 ते 10 या वेळेत अत्यावश्यक खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. यामुळे अनेक नागरिक गरजेनुसार खरेदीसाठी घराबाहेर पडतात. पण 8 वाजताच पोलिसांकडून दुकाने बंद करण्याची कार्यवाही केली जात आहे. तसेच वाहनधारकांची अडवणूक करून घरी पाठवले जाते. पण एकीकडे दारू दुकाने चालू असताना किराणा दुकाने बंदीची कारवाई असे विदारक प्रकार निपाणीचा बाजारपेठेत शनिवारी दिसून आले.
कडक लॉकडाऊन ही गरज आह.s सध्या कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. अनेक रुग्णांना तर उपचार मिळणेही दुरापास्त झाले आहे. सरकारी व खासगी कोविड सेंटरमध्ये बेड मिळेनासे झाले आहेत, अशा परिस्थितीत प्रत्येकाने सुरक्षित राहणे व कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही कार्यवाही महत्त्वाची आहे हे सर्वांनाच उमगले आहे. यामुळे शासनाच्या निर्णयाला पाठबळ देत नागरिकही आपला रोजगार सोडून घरीच बसून राहिले आहेत. यातून कोरोना साखळी तोडण्यासाठी लाभदायक ठरणार आहे.
शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर करताना घरातून बाहेर पडल्यावर बंदी घातली आहे. कारखान्यासह उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. फक्त अत्यावश्यक खरेदीसाठी सकाळी सात ते दहा या वेळेत बाहेर पडता येत.s या ठिकाणीही दुचाकीचा वापर करण्यावर निर्बंध घातले आहेत. यासर्व नियमांचे पालन होत असताना शनिवारी मात्र पोलिसांनी अचानक कारवाई करताना दलाल पेठ येथील सर्व किराणा दुकाने सकाळी आठ वाजताच बंद करण्यास भाग पाडले. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या दुकानदारांसह ग्राहकांची गैरसोय झाली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यावसायिक व ग्राहकांची त्रेधा उडाली.
व्यापारी, खरेदीदारांना परत पाठविले
शहरातील ग्राहक असोत किंवा ग्रामीण भागातील किराणा दुकानदार नेहमी निपाणीतच खरेदीसाठी येत असतात. ग्रामीण भागातील ग्राहकही काहीवेळा खरेदीसाठी निपाणीच दाखल होतात पण या कारवाईमुळे सर्वांचीच गैरसोय झाली आहे. किराणा व्यवसायिक, कर्मचाऱयांना काम न करताच माघारी परतावे लागले. यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे व्यवसाय नाही आणि दुसरीकडे प्रवास खर्च असा ताण त्यांच्यावर पडत आहे. हे सर्व सुरू असताना दारू दुकाने मात्र नियमितपणे सुरू होती तेथे कोणतीही कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही. यामुळे किराणा अत्यावश्यक की दारू अत्यावश्यक असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अचानक कारवाई नको, पूर्वसूचना द्या
पोलिसांच्या या दुटप्पी कारवाईमुळे व्यावसायिकांसह ग्राहक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. कोरोना काळात गर्दीतून संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन योग्य आहे. मात्र अंमलबजावणी करताना अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद होणे गरजेचे आहे. असे असताना किराणा दुकाने बंद करण्याची लगबग आणि दारु दुकाने सुरूच असा प्रकार पोलिसांनी चालविल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करताना त्यांनी दिलेली मुभा देखील विचारात घ्यावी. त्याचप्रमाणे अचानक कारवाई करण्यापेक्षा नियमात बदल करण्याची घोषणा एक दिवस अगोदर करावी, अशी मागणी होत आहे