प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी मनी लाँडरींग, बेनामी व्यवहाराद्वारे 127 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आज मंगळवारी 28 सप्टेंबर कोल्हापूर दौऱयावर येत आहेत. त्यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर, संताजी घोरपडे कारखाना, मुरगुड पोलीस ठाणे, हॉटेल आयोध्या आदी ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमय्यांनी मुश्रीफांच्या कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला बाहेरून भेट देऊन पाहणी करण्याचा निर्णय रद्द केला आहे. ते मुरगूड पोलीस ठाण्यात जावून तक्रार देणार आहेत. त्यानंतर कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱयांनी सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱयाची तयारी केली आहे. मंगळवारी सकाळी 10ः30 च्या सुमारास सोमय्या हे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार, खासदार गोपाल शेट्टी यांच्यासह कोल्हापूरमध्ये येणार आहेत. छत्रपती ताराराणी चौक येथे त्यांचे भाजपतर्फे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता ते अंबाबाईचे दर्शन बाहेरून घेणार आहेत. त्यानंतर कागलकडे रवाना होणार असून मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ते पुन्हा कोल्हापूरमध्ये येणार आहेत. हॉटेल आयोध्यावर ते दुपारी चार वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. स्थानिक भाजप पदाधिकाऱयांबरोबर बैठक घेऊन मार्गदर्शनही करणार आहेत. रात्री साडेआठवाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईला रवाना होणार आहेत. सोमय्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते नियोजन करत आहेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी संयम ठेवावा – मंत्री हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले. निषेध केला. त्यामुळे जिल्हÎातील वातावरण बदलले होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक असताना सोमय्या ते कोल्हापूर दौऱयावर येत आहे. राज्यासह जिल्हÎाचे लक्ष दौऱयाकडे लागले आहे. दरम्यान, सोमय्या यांना रोखू नये, त्यांना त्यांना त्यांचा दौरा पूर्ण करु द्यावा, कार्यकर्त्यांनी संयम ठेवा, टीव्ही बंद करुन कुटुंबासोबत रहावे, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.