सातारा / प्रतिनिधी :
भल्या पहाटे थंडीच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत, तुताऱ्यांच्या निनादात, सनईचा मंजूळ सूर आणि हलगीच्या वादनाने किल्ले अजिंक्यताऱ्यावरील राजसदरेवर वातावरण शिवमय झाले होते. निमित्त होते छत्रपती शाहु महाराजांच्या राज्यभिषेक दिन सोहळय़ाचे. शिवभक्त, शाहुभक्तांनी किल्याच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शाहु महाराजांची दहा वर्षापूर्वी ठरवल्याप्रमाणे पालखी जयघोषात फुलांच्या वर्षावात गडावरील देवतांचे दर्शन घेवून राजसदरेवर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात आसमंत दणाणून सोडत विसावली. 2032 साली चांदीच्या पालखीत सोन्याची छ. शाहु महाराजांच्या मूर्तीसह पालखी सोहळा करण्याचा संकल्ल्प या दिनी करण्यात आला.
गेली 12 वर्षांपासून शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने छत्रपती शाहु महाराजांचा राज्यभिषेक सोहळा किल्ले अजिंक्यताऱ्यावर साजरा करण्यात येतो आहे. याही वर्षी प्रथेप्रमाणे उत्साही वातावरणात शाहु महाराजांचा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजममुंडे, कन्हैय्यालाल राजपुरोहित, संतोष शेडगे, दत्ताजी भोसले, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, संग्राम बर्गे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर, सुदाम गायकवाड, निलेश झोरे, सचिन जगताप, ऍड. विनीत पाटील, युवा करिअर ऍकॅडमीचे विश्वास मोरे, एलबीएस कॉलेजचे महेश गायकवाड, ऍड. अरविंद कदम, मंगेश काशिद, रवी पवार, प्रकाश घुले, गणेश दुबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुडकुडत्या थंडीत छत्रपती शिवाजी महाराज कि जयचा जयघोष करत शिवभक्त व शाहु भक्तांनी भल्या पहाटे गड गाठला. गडाच्या पायथ्याला सगळय़ा शिवभक्तांनी छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीला प्रारंभ केला. पालखी भराभर मावळय़ांनी गडाच्या पायऱ्या चढवत नेली. गडावरील देवतांचे दर्शन घेवून राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहु महाराज की जय अशा घोषणा देत विसावली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन राज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
पालखीला महिला भगिनीनी दिला खांदा
किल्ल्यावर पालखी पोहचताच मंगळाईच्या दर्शनानंतर आज राजमाता जिजाऊ जयंती असल्याने उपस्थित महिला भगिनींनी छत्रपती शाहु महाराजांच्या पालखीला खांदा दिला. पालखीवर पुष्पवृष्टी करत शिवाजी महाराज की जयघोष म्हणत पुढे तुताऱ्यांच्या निनाद, हलगीचा आवाजात वातावरण बदलून गेले होते.
मुस्लिम बांधवांनाही पालखीचा मान
इतिहासामध्ये पालखीला एक मोठे महत्व आहे. पालखीचा सोहळा शाहु महाराजांच्या राज्यभिषेक सोहळय़ानिमित्ताने काढण्यात आला होता. या सोहळय़ात पालखीचा मान मुस्लिम बांधवांना देण्यात आला. अगदी मंदिरापर्यंत त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.
मोरे-पाटील अन् जगताप घराण्याने जपली परंपरा
गोडोली गावचे मानकरी म्हणून मोरे-पाटील यांची ओळख आहे. गोडोलीच्या देवाचे मानकरी शेखर मोरे-पाटील हे दरवर्षी न चुकता या सोहळय़ाला हजेरी लावतात तसेच गोडोलीतील जगताप घराणेही या सोहळय़ाला हजेरी लावतात. मोरे-पाटील आणि जगताप घराण्याने याहीवर्षी आपली परंपरा जपली आहे.
निमंत्रणाशिवाय कार्यक्रम साजरा
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱयांनी नवे निर्बंध लागू केले असल्याने यावर्षी आयोजकांच्यावतीने कोणालाही निमंत्रण दिले नव्हते वा कोणतीही निंमंत्रणपत्रिका छापली नव्हती. केवळ दरवर्षीप्रमाणे गडावर कार्यक्रम आहे एवढेच माहिती असल्याने शिवभक्तांनी हजेरी लावली. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने साजरा करण्यात आला.