सातारा :
अजिंक्यतारा हा केवळ एक गडकिल्ला नसून, महाराष्ट्राची अस्मिता आहे. याच किल्ल्यावरुन मराठा साम्राज्याचा राज्यकारभार पाहिला जात होता. त्यामुळेच या अजिंक्यतारा किल्ल्यास एक वेगळे वैभव प्राप्त झाले आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणे जेष्ठांसह सर्वांना अधिक सुलभ व्हावे, यासाठी किल्ले अजिंक्यतारा ते पायथा असा रोप वे उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या कामी आवश्यक असणारे आराखडे, अंदाजपत्रक, पुरातत्वखात्यासह विविध परवानग्या घेवून लवकरच हा रोप वे सर्वांसाठी साकारला जाईल, असे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
किल्ले अजिंक्यताऱयावर जाण्यासाठी रोप वे उभारणे कामी आज उदयनराजे यांनी देशातील अग्रगण्य असणारी एसजी एफआरएल या कंपनीच्या तज्ञांसह किल्ले अजिंक्यतारा आणि परिसराची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, हद्यवाढ झाल्यामुळे अजिंक्यतारा किल्ला आता सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. हा किल्ला म्हणजे दगड मातीचा किल्ला नसून, मराठा साम्राज्याचा आणि सातारकर शाहुनगरवासियांसह महाराष्ट्रीयन व्यक्तींची अस्मिता आहे. या किल्ल्यावर ऐतिहासिक राजसदर, श्री मंगळाई मंदिर, दक्षिणाभिमुखी मारुती मंदिर यासह सात जिवंत पाण्याची तळी, ऐतिहासिक दक्षिण दरवाजा, आदी प्रमुख ठिकाणे आणि ओळखीच्या खुणा इतिहासप्रेमींसह भाविक-पर्यटक यांना आकर्षित करीत असतात. नवरात्रात तर सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरुच असतो.
सातारा जिल्हयाला जागतिक पातळीवर कास पठास हे पर्यटन स्थळ लाभले आहे. सर्वांनाच भुरळ घालणारी महाबळेश्वर आणि पाचगणी ही विख्यात पर्यटन स्थळे तर जिल्हयाचा आत्मा आहे. या पार्श्वभुमीवर ऐतिहासिक सातारचाही पर्यटनाच्या दृष्टीने विकास घडवून, आर्थिक चक्राला गती देणे असे मुख्य उदिष्ट आहे. त्याकरीताच किल्ले अजिंक्यतारा ते पायथा असा रोप वे उभारण्याचे आम्ही निर्णय घेतलेला आहे, असे त्यांनी सांगितले.