महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याकडून मान्यता; शिवप्रतिष्ठानच्या कार्याला यश
प्रतिनिधी / उंब्रज :
शिवकालीन शौर्याचा वारसा जपणाऱ्या व सरसेनापती हंबीरराव मोहीते यांच्या पराक्रमाचा साक्षिदार असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले वसंतगड येथील ढासळेलेल्या बुरूंजाच्या पुनर्बाधंणीसाठी महाराष्ट्र शासणाच्या पुरातत्व खात्याकडून मान्यता मिळाली आहे. किल्ले प्रतापगडवरील पडझड झालेल्या बुरूंजाची पुरातत्व खात्याच्या सूचनेप्रमाणे पुर्नउभारणी केल्यानंतर आता सह्याद्री प्रतिष्ठानच्या या मागणीला यश आले असून, अनेक दुर्ग प्रेमी व टीम वसंतगडच्या साथीने हे काम होणार आहे. या कामासाठी राज्यभरातील दुर्गप्रेमींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानेच संस्थापक श्रमिक गोजमगुंडे तसेच शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष व तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांनी केले आहे.
ऐतिहासिक किल्ले वसंतगडावरून सोमवारी सायंकाळी श्रमिक गोजमगुंडे व दीपक प्रभावळकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील दुर्गप्रेमींना किल्ले वसंतगडसाठी ही साद घातली. यावेळी तळबीडचे सरपंच जयवंत मोहिते, जिजाबा मोहिते, जयाजी मोहीते, सह्याद्री प्रतिष्ठानचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर माने यांच्यासह सह्याद्री प्रतिष्ठान पुणे विभाग, सातारा विभागातील दुर्गसेवक तसेच टीम वसंतगडचे रामभाऊ माळी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर वसंतगडचे सरपंच अमित नलावडे यांची भेट सह्याद्री प्रतिष्ठानकडून घेण्यात आली. यावेळी त्यांनीही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
यावेळी दीपक प्रभावळकर म्हणाले, महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाला अलीकडे जाग आली आहे. मात्र शासनाच्या या भुमिकेपुर्वी कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांवर अनेक संस्था कार्य करत आहेत. तसेच अनेक प्रकारचे दुर्ग-संवर्धन यापूर्वी झाले आहे. शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय तसेच शासनाचे कुठलीही मदत न घेता अनेक संस्थांनी या गड-किल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाचे बेसिक काम उभं केलं आहे. त्यापैकी सह्याद्री प्रतिष्ठानला तळबीड येथील वसंतगडच्या पश्चिमेकडचा बुरुंज ढासळल्याचे कळले आणि ते कामाला लागले. या ढासळलेल्या बुरुजांच्या पुर्नजीवन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याने या कामाला रीतसर परवानगी दिली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या इतर कामांवेळी आपण सगळेजण जसे भक्कमपणे उभे होता तसेच पुन्हा एकदा हा ढासळलेला बुरुजांचे पुनर्जीवन करताना उभे राहवे. आपल्याला लोकांना गडकिल्ल्यावर आणायचा आहे. परत एकदा दुर्ग प्रेमाचं भरत आणायचं असून यासाठी प्रत्येकाने सह्याद्री प्रतिष्ठानच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन प्रभावळकर यांनी यावेळी केले.
वास्तविक अफजलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सन 1659 साली किल्ले वसंतगड स्वराज्यात आणला होता. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांचेही वास्तव काहीकाळ किल्ले वसंतगडावर होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या तळबीड गावची सरसेनापती हंबीरराव मोहिते, महाराणी ताराराणी ही दोन रत्ने असून हिंदवी स्वराज्य संरक्षणात त्यांचे अनमोल असे योगदान आहे. अशा या पावन भूमितील किल्ले वसंतगडवरील दक्षिण पश्चिम बाजूचा बुरूंज मागील वर्षी पावसाळ्यात ढासळला होता. तेव्हापासून या बुरूंजाच्या संवर्धनासाठी टीम वसंतगडकडून दर रविवारी विशेष मोहिम हाती घेतली जात आहे.
त्याचवेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे हे आपल्या सहकार्यांसह राज्य पुरातत्व खात्याकडे या बुरूंजाच्या पुर्नबांधणीसाठी पाठपुरावा करत होते. सोमवारी सायंकाळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी दर्शन घेत सह्याद्री प्रतिष्ठान आणि टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी पडझड झालेल्या बुरूंजाच्या कामास श्रीफळ वाढवून प्रारंभ केला.यावेळी थेट किल्ले वसंतगडावरून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रमिक गोजमगुंडे आणि दीपक प्रभावळकर यांनी सह्याद्री प्रतिष्ठानसह टीम वसंतगडच्या कार्यास मदत करण्याचे आवाहन केले. तर तळबीडचे सरपंच जयवंत मोहिते यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान पुणे विभाग दुर्गसेवक ज्योती शेडे, गौरव शेवाळे, संजय गोडगुद्री, सुशांत मोकाशी, अक्षय मेढे, सह्याद्री प्रतिष्ठान उरळी काचंन तसेच कराड तालुका प्रशासक विश्वजीत जाधव, चंद्रजीत पाटील, राहुल जाधव हे कराड तालुक्यातील दुर्गसेवक उपस्थित होते.
खासदारांकडून कौतुक अन् शिवकार्यास निधी
किल्ले वसंतगडवरून उतरल्यानंतर दीपक प्रभावळकर व श्रमिक गोजमगुंडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या मावळ्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रमिक गोजमगुंडे यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत आहे. गडकोट आपली अस्मिता असून हे जपण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यास सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. तसेच खासदारांनी सह्याद्री प्रतिष्ठानकडे वसंतगड संवर्धनासाठी निधीही सुपूर्द केला.