महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याकडून मान्यता- सहय़ाद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी/ उंब्रज
शिवकालीन शौर्याचा वारसा जपणाऱया व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणाऱया ऐतिहासिक किल्ले वसंतगड येथील ढासळलेल्या बुरूजाच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याकडून मान्यता मिळाली आहे. किल्ले प्रतापगडवरील पडझड झालेल्या बुरूजाची पुरातत्व खात्याच्या सूचनेप्रमाणे पुर्नउभारणी केल्यानंतर आता सह्याद्री प्रतिष्ठानच्या या मागणीला यश आले असून अनेक दुर्गप्रेमी व टीम वसंतगडच्या साथीने हे काम होणार आहे. या कामासाठी राज्यभरातील दुर्गप्रेमींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष व ‘तरुण भारत’चे आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांनी केले आहे.
ऐतिहासिक किल्ले वसंतगडावरून सोमवारी सायंकाळी श्रमिक गोजमगुंडे व दीपक प्रभावळकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील दुर्गप्रेमींना किल्ले वसंतगडसाठी ही साद घातली आहे. यावेळी तळबीडचे सरपंच जयवंत मोहिते, जिजाबा मोहिते, जयाजी मोहिते, सह्याद्री प्रतिष्ठानचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर माने यांच्यासह सह्याद्री प्रतिष्ठान पुणे विभाग, सातारा विभागातील दुर्गसेवक तसेच टीम वसंतगडचे रामभाऊ माळी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर वसंतगडचे सरपंच अमित नलावडे यांची भेट सह्याद्री प्रतिष्ठानकडून घेण्यात आली. यावेळी त्यांनीही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
दीपक प्रभावळकर म्हणाले, महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाला अलीकडे जाग आली आहे. मात्र शासनाच्या या भूमिकेपूर्वी कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांवर अनेक संस्था कार्य करत आहेत. शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय तसेच शासनाची कुठलीही मदत न घेता अनेक संस्थांनी या गड-किल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाचे बेसिक काम उभे केले आहे. त्यापैकी सह्याद्री प्रतिष्ठानला तळबीड येथील वसंतगडच्या पश्चिमेकडचा बुरुज ढासळल्याचे कळले आणि ते कामाला लागले. या ढासळलेल्या बुरुजाच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याने या कामाला रीतसर परवानगी दिली आहे.
वास्तविक अफजलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सन 1659 साली किल्ले वसंतगड स्वराज्यात आणला होता. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांचेही वास्तव काही काळ किल्ले वसंतगडावर होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या तळबीड गावची सरसेनापती हंबीरराव मोहिते, महाराणी ताराराणी ही दोन रत्ने असून हिंदवी स्वराज्य संरक्षणात त्यांचे अनमोल असे योगदान आहे. अशा या पावन भूमीतील किल्ले वसंतगडवरील दक्षिण पश्चिम बाजूचा बुरूज मागील वर्षी पावसाळ्यात ढासळला होता. तेव्हापासून या बुरूजाच्या संवर्धनासाठी टीम वसंतगडकडून दर रविवारी विशेष मोहीम हाती घेतली जात आहे. त्याचवेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे आपल्या सहकाऱयांसह राज्य पुरातत्व खात्याकडे या बुरूजाच्या पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करत होते. सोमवारी सायंकाळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी दर्शन घेत सह्याद्री प्रतिष्ठान आणि टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी पडझड झालेल्या बुरूजाच्या कामास श्रीफळ वाढवून प्रारंभ केला.
यावेळी थेट किल्ले वसंतगडावरून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्रमिक गोजमगुंडे आणि दीपक प्रभावळकर यांनी सह्याद्री प्रतिष्ठानसह टीम वसंतगडच्या कार्यास मदत करण्याचे आवाहन केले. तळबीडचे सरपंच जयवंत मोहिते यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान पुणे विभाग दुर्गसेवक ज्योती शेडे, गौरव शेवाळे, संजय गोडगुद्री, सुशांत मोकाशी, अक्षय मेढे, सह्याद्री प्रतिष्ठान उरळी कांचन तसेच कराड तालुका प्रशासक विश्वजीत जाधव, चंद्रजीत पाटील, राहुल जाधव हे कराड तालुक्यातील दुर्गसेवक उपस्थित होते.
खासदारांकडून कौतुक अन् शिवकार्यास निधी
किल्ले वसंतगडवरून उतरल्यानंतर दीपक प्रभावळकर व श्रमिक गोजमगुंडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या मावळ्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रमिक गोजमगुंडे यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत आहे. गडकोट आपली अस्मिता असून, ते जपण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यास सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. तसेच खासदारांनी सह्याद्री प्रतिष्ठानकडे वसंतगड संवर्धनासाठी निधीही सुपूर्द केला.
किल्ले वसंतगड हा महाराष्ट्र शासन व पुरातत्व खात्याकडून दुर्लक्षित राहिलेला किल्ला आहे. मात्र अनेक गडप्रेमींचे हात या गडाच्या संवर्धनासाठी झटत आहेत. याकामी सन 2016 ला शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर यांनी या गडावर दुर्ग संमेलन घेऊन महाराष्ट्रातील दुर्गप्रेमी व शिवमावळ्यांना या गडावर बोलावून संवर्धनाची हाक दिली. त्यानंतर वसंतगडचा जाज्वल इतिहास जपण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सद्यस्थितीत गडाच्या पश्चिमेकडील ढासळलेल्या बुरुजाच्या दुरुस्तीला शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून मान्यता मिळाली आहे. मात्र गडावरील तट, पायवाट, प्रवेश दरवाजा, चंद्रसेन महाराज मंदिर तसेच इतर बुरुजांच्या संरक्षणासाठी शासनाने वेळीच लक्ष द्यावे.