देशभरातून पर्यटक मालवणला होऊ लागले दाखल : किल्ले भ्रमंतीचा आनंद
मालवण:
शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवर पुन्हा एकदा ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष दुमदुमू लागलाय. आठवडा अखेरीस किल्ले सिंधुदुर्गवर पर्यटकांची रेलचेल वाढू लागली असून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी आसंमत दणाणून जात आहे. कोरोना संक्रमणाची तीव्रता कमी झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मालवणात देशभरातून पर्यटक दाखल होऊ लागले आहेत.
कोरोना महामारीतील दुसऱया लाटेमुळे एप्रिल महिन्याच्या मध्यावर ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद झाले होते. दरवर्षी एक सप्टेंबरपासून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक सुरू होते. मात्र, यंदा जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींची पडताळणी करीत नऊ सप्टेंबरपासून किल्ला प्रवासी वाहतुकीस मान्यता दिली. तरीपण त्या वेळच्या कालावधीत वादळी वाऱयांमुळे किल्ला प्रवासी सुरू करता आली नव्हती. या आठवडाभरात मात्र किल्ला प्रवासी वाहतुकीने बऱयापैकी जोर धरला असून कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंतीचा आनंद दिला जातो आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले झाल्याने पर्यटकांमध्येही उत्साह दिसत आहे. जगावर ओढवलेले कोरोना महामारीचे महासंकट लवकरात लवकर कायमचे दूर व्हावे, अशा प्रतिक्रियादेखील पर्यटकांनी व्यक्त केल्या.
किल्ला देखभाल-दुरुस्तीवर नाराजी
दरम्यान, पर्यटकांकडून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळय़ात किल्ल्यात गवत वाढणार हे स्वाभाविकच आहे. परंतु या गवतामध्ये किल्ल्यातील कित्येक पायवाटा हरवल्या आहेत. त्या पायवाटा मोकळय़ा करण्यासाठी लवकरात लवकर साफसफाई आवश्यक असल्याचे पर्यटकांनी सांगितले. तसेच किल्ल्याच्या तटबंदीवर वाढलेल्या झाडा-झुडपांबद्दल पर्यटकांनी चिंता व्यक्त केली. तटावर वाढलेल्या झाडीमुळे पर्यटक त्या भागात जाण्याचे टाळत आहेत. सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी खुला करीत असताना किमान पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता तरी शासनाने करावी, एवढी अपेक्षा आहे, असे अनेकांनी सांगितले.
डॉ. भालकी म्हणाले, सार्थ अभिमान!
कर्नाटक रायचूर येथील डॉ. नागराज भालकी हे आपल्या कुटुंबियांसमवेत किल्ला पाहण्यासाठी आले होते. ते म्हणाले, आपल्या देशात सिंधुदुर्गसारखे किल्ले आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि दूरदृष्टीचा पुरेपूर प्रत्यय आपणास येथे येतो. परंतु एवढय़ा मोठय़ा ऐतिहासिक वास्तूच्या देखभाल-दुरुस्तीकडे जितक्या गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, तेवढे दिले जात नाही, असे दिसते. केंद्र व राज्य शासनाने यासाठी एखादी समिती स्थापन करून किल्ल्याची योग्य प्रकारे निगा राखण्यासाठी पावले उचलावीत, असे आपल्याला वाटते.