वैभव नाईक यांचे आवाहन : अतुल रावराणे यांच्या वाढदिनी विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
प्रतिनिधी / विजयदुर्ग:
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांतील प्रत्येक गोष्टीचे जतन व संवर्धन करणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे. या किल्ल्यांचा ऐतिहासिक ठेवा जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. या किल्ल्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी शासनस्तरावर आपण निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केले.
वैभववाडी येथील श्री भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, संदेश सावंत, राजू राठोड, मंगेश लोके, राजू शेटय़े, महेश रावराणे, समीर रावराणे, शिवाजी बारावकर, बाबू तावडे, संतोष बोडके, धुळजी काळे, राजू तावडे, रमाकांत राणे, अतुल आंबेरकर, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये आदी उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, शिवसेना नेते रावराणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसारखा राबविलेला उपक्रम आजच्या पिढीसाठी आदर्शवत आहे. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. या ऐतिहासिक किल्ल्यांचे महत्व पुढील पिढीला समजण्यासाठी या किल्ल्यांचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज आहे. कोरोना संक्रमण काळातही अतुल रावराणे यांनी राबविलेले समाजाभिमुख उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे ते म्हणाले.
राजकारणात राहून समाजकारणाला प्राधान्य!
रावराणे म्हणाले, राजकारणात राहूनही आपले पहिले कर्तव्य समाजकारण राहिले आहे. समाजाभिमुख उपक्रमांना आपण प्राधान्यक्रम दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या जिल्हय़ातील किल्ल्यांचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. याकरिता आपण वाढदिवसाचे औचित्य साधून विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली आहे.