असे प्रकार पुन्हा खपवून न घेण्याचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
तानाजी गल्ली येथे लहान मुलांनी केलेल्या किल्ल्याची काही समाजकंटकांनी नासधूस केली. लहान मुलांनी परिश्रम घेऊन केलेल्या किल्ल्याची नासधूस करण्यात आली. हा प्रकार लाजीरवाणा असून या प्रकाराचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे निषेध करण्यात आला. असे प्रकार पुन्हा खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी दिला आहे.
लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, तसेच त्यांचे मातीशी नाते कायम रहावे या उद्देशाने किल्ला बनविला जातो. बेळगावमध्ये भलेमोठे हुबेहूब किल्ले साकारले जातात. किल्ले पाहण्यासाठी लोक बाहेरून येतात. तसेच विविध संस्था-संघटना किल्ला स्पर्धांचे आयोजन करून ही कला जोपासण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
परंतु काही समाजकंटकांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. लहान मुलांनी केलेल्या किल्ल्याची नासधूस करून काय साध्य होणार? असा प्रश्न उपस्थित होतो. शौर्याचे प्रतीक असणाऱया छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱया किल्ल्यांची निर्मिती यापुढेही होत राहणार आहे. त्यामुळे असे प्रकार ज्यांनी केले त्यांच्यावर प्रशासनाने लवकर कारवाई करावी, अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शिवप्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला आहे.