दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ः प्रवाशांच्या अंगावर कोसळण्याचा धोका
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध बसथांब्यांचा विकास करण्यात आला आहे. मात्र, स्मार्ट बसथांब्याशेजारीच जीर्ण झालेल्या बसथांब्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शिवाजीनगर, किल्ला परिसरात असलेल्या बसथांब्याच्या छताचे पत्रे कोसळत असून, प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. धोकादायक बसथांबा हटविण्याकडे मनपा प्रशासन लक्ष देईल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत
आहे.
स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करून प्रवाशांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला आहे. मात्र, या कामी महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी कंपनी अपयशी ठरली आहे. शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यासाठी कोटय़वधीचा खर्च करण्यात आला आहे. बसथांब्यांशेजारीच जुने बसथांबे जैसे थे ठेवण्यात आले आहेत. मात्र, सदर बसथांबे मोडकळीस आले असून, प्रवाशांच्या अंगावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरात विविध ठिकाणी असे बसथांबे आहेत, पण याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. राणी चन्नम्मा चौक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेला बसथांबा जीर्ण झाला आहे. शिवाजीनगर किल्ला परिसरात असलेल्या बसथांब्याच्या छताचे पत्रे कोसळत आहेत. हा बसथांबा पत्र्याचा बनविण्यात आला होता. पण हे पत्रे पूर्णपणे गंजले असून कोसळत चालले आहेत. प्रवाशांच्या अंगावर कोसळण्याचा धोका असल्याने याकडे प्रशासन लक्ष देईल का? अशी विचारणा करण्यात येत आहे.
वास्तविक, बसथांब्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. पण बसथांब्यांच्या दुरुस्तीकडे मनपा अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे मनपा अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. जीर्ण झालेले बसथांबे हटवून नवीन बसथांबे उभारण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.