सातारा प्रतिनिधी
भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामातील ऊसाची थकीत बिले दिलेली नाहीत. त्या बिलांची मागणी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी सकाळपासूनच साखर कारखान्याच्या बाहेर होते. त्यांना प्रशासनाकडून कसलीही दाद न दिल्याने शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी कारखान्याच्या गेटवर कारखाना व्यवस्थापनाच्या नावाने निदर्शने केली. शेतकऱयांच्या घामाचा पैसा परत देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वाई तालुक्यातील किसन वीर कारखान्यास गतवर्षी ऊस घातलेले कोडोलीतील श्रीमती सुलोचना सुतार, सुभाष कापले, मेणवली येथील दिलीप पाटणे, दत्तात्रय चौधरी, कळंबेचे रामदास इंदलककर, कुडाळचे दत्तात्रय रासकर, तुकाराम पाटणे, ओझर्डेचे गुलाबराव कदम, कुडाळचे अप्पाजी सणस, म्हसवेचे आनंदराव शिर्के, आसलेचे प्रकाश वाघ यांनी गुरुवारी सकाळी ऊस बिल मागण्यासाठी किसन वीर कारखान्यावर गेले. परंतु कारखाना व्यवस्थापनाकडून त्यांची दखलच घेतली नाही. त्यांची भेट न घेता शेतकऱ्यांशी कसलाही संवाद साधला नाही. शेतकऱ्यांनी दुपारपर्यंत प्रशासनाची प्रतिक्षा करुन आक्रमक होवून दुपारी कारखान्याच्या समोरच निदर्शने केली. आम्ही आमच्या शेतात ऊस पिकवला. तो शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या किसन वीर कारखान्यात गतवर्षी गाळप केला. आम्हाला आर्थिक चणचण असल्याने गतवर्षीचे बील कारखान्याने दिले पाहिजे. बिल देण्याकरता त्यांच्याकडून कोणतीही चर्चा अगर आश्वासनही मिळण्याकरता प्रशासनाकडील अधिकारीही भेटले नसल्याने हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या अशा वर्तणूकीचा निषेध आहे, अशा शब्दात प्रतिक्रिया शेतकऱयांनी दिली. दरम्यान, त्यांनी फोनवरुन प्रशासनाशी संपर्कही साधला परतुं त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाल्याने नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.