प्रतिनिधी/ सातारा
वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावली, सातारा आणि कोरेगाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांचे कार्यक्षेत्र असलेल्या भुईंज येथील ‘किसन वीर’ कारखान्यासाठी आज 155 मतदान केंद्रावर 52 हजार 90 मतदारांपैकी 36 हजार 102 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. सायंकाळी मोठय़ा प्रमाणात मतदार बाहेर पडले त्यामुळे 69. 31 टक्के मतदान झाले. आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी बोपेगाव येथे तर किसन वीरचे चेअरमन मदन भोसले यांनी भुईंज येथे मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले असून दि. 5 रोजी 67 टेबलवर मतमोजणी होणार आहे.
वाई तालुक्यासह जिह्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व बहूचर्चित अशा किसन वीर सहकारी साखर कारखान्यासाठी मंगळवारी सहा तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांचे किसन वीर शेतकरी बचाव पॅनेल तर चेअरमन मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल असे दोन्ही पॅनेलमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. गावोगावी सभा, कोपरासभामधून जोरदार प्रचार झाला. दोन्ही बाजूकडून कार्यकर्त्याची फोडाफोडी आणि जोडजोडीची मोहीम शेवटपर्यंत सुरू होती. मंगळवारी रात्रीपर्यंत प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोशल मीडियावर ही आरोप होत होते लगेच दुसऱया बाजूकडून खंडन होत होते.
मंगळवारी सकाळी किसन वीर कारखान्यासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी हे स्वतः निवडणूक प्रक्रियेत लक्ष देऊन होते. सकाळी सर्वच मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसत होती. सकाळी दहा वाजेपर्यत 8,239 मतदारांनी मतदान केले होते तर सोसायटीमधून 27 मतदारांनी मतदान केले होते. दुपारी 12 पर्यंत 16,696 मतदारांनी मतदान झाले. तर सोसायटीचे 227 मतदारांनी मतदान केले. दुपारी 2 पर्यंत 25,107 मतदान झाले. सोसायटीचे 273 मतदारांनी मतदान केले. दुपारी 4 पर्यत 32,432 मतदान झाले तर सोसायटीमधून 301 मतदारांनी मतदान केले. अंतिम आकडेवारी 35,771 जण व्यक्तीगत सभासदानी मतदान केले तर सोसायटी गटातून 331 मतदान झाले. आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी बोपेगाव येथे मतदान केंद्रावर मतदान केले. तर किसन वीरचे चेअरमन मदन भोसले यांनी भुईंज मतदान केंद्रावर मतदान केले. दोन्ही पॅनेलचे बूथ मतदान केंद्राबाहेर लागले होते. दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या.
मतमोजणी दि. 5 रोजी सकाळी 8 वाजता
मतदान झालेल्या मतपेटय़ा वाई येथील एमआयडीसी येथील मंगल कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणी दि. 5 रोजी सकाळी 8 वाजता 77 टेबलवर करण्यात येणार आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी सांगितले.