मतमोजणी केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी/ सातारा
सहा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांच्या जवळचा असलेला किसन वीर कारखान्यासाठी मंगळवारी 69.31 टक्के मतदान झाले. याची मतमोजणी गुरुवारी सकाळी सुरु होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कार्यंकर्त्यांनी गुलालाची पोती खरेदी करुन ठेवली असून काहींनी पैजाही लावलेल्या आहेत. कपबशी की विमान हे उद्या दुपारपर्यंत समजणार आहे. दरम्यान, किसनवीर कारखाना पुन्हा मदनदादांकडे राहणार की मकरंद आबा कारखाना काबीज करणार याचा फैसला होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे जिल्हय़ाच्या नजरा लागल्या आहेत.
गेली दोन वर्ष किसन वीर कारखान्याच्या धुराडय़ाला ठिकसा योग मिळत नव्हता. कारखाना प्रशासनाकडून ज्या प्रमाणे शेतकऱयांच्या ऊसाला तोड लगेच द्यायला हवी होती. ऊस बिल, कामगारांचे बिले वेळेत अदा करायला हवी होती. मात्र, त्यांच्याकडून ते झाले नाही. हाच मुद्दा विरोधकांनी प्रचारामध्ये हाती घेतला होता. विद्यमान चेअरमन मदन भोसले यांच्याबाबत असलेली प्रचंड नाराजी शेतकऱयांमध्ये दिसून येत होती. मदन भोसले यांच्याकडून शेतकऱयांचा अपेक्षाभंग झाल्याचे आरोप झाले. त्यांच्याकडूनही विरोधकांच्यावर कारखान्याचा लिलाव होईल् असाही आरोप केला गेला. कारखान्याला कर्ज मिळवून दिले नाही, अशीही टीप्पणी वारंवार झाली. परंतु दोन्ही पॅनेलकडून आरोप प्रत्यारोप झाले असले तरीही गेली दोन वर्ष कारखान्याकडून शेतकऱयांचा जो त्रास सुरु आहे त्यामुळे सुरुवातीला सभासद मतदानाला बाहेर पडला नव्हता. अक्षय तृतीयाचा सण साजरा करुन मतदानाला मतदार गेला. त्यामुळे गुरुवारी मतमोजणीवेळी कपबशी जिंकणार की विमान हवेत उडणार हे पहायला मिळणार आहे.
दरम्यान, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गुलालाची पोती घेऊन ठेवली आहेत. तसेच नेत्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आल्याचे समजते. निकालाकडे सगळयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडून नियोजन करण्यात आले आहे.