योगींकडून कांवड यात्रेचा उल्लेख ः मोठा राजकीय संकेत दिल्याची चर्चा
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता 10 दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. अशा स्थितीत राजकीय वातावरण पूर्णपणे तापू लागले आहे. विरोधी पक्ष सरकारचे अपयश मांडू पाहत आहेत. तर सत्तारुढ भाजप विजयाचे समीकरण तयार करण्यासाठी मुद्दे जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुरादनगर येथील सभेत उपस्थित केलेले मुद्दे हे विरोधकांना कोंडीत पकडणारे होते. यामुळे निवडणूक आता वेगळय़ा मोडमध्ये जात असल्याचे स्पष्ट झाले. योगींनी शेतकऱयांचा उल्लेख केला, त्यानंतर गुंडांवरील कारवाईवर भूमिका मांडली, मग अखेरीस त्यांनी कांवड यात्रेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
उत्तरप्रदेशात कांवड यात्रा एक मोठा मुद्दा आहे. जाट आणि गुर्जर समुदायादरम्यान कांवड यात्रेला अत्यंत पवित्र मानले जाते. कांवड यात्रेवर समाजाची मोठी श्रद्धा राहिली आहे. समाजवादी पक्षाच्या शासनकाळात कांवड यात्रेवर बंदी घालण्याचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांची कमजोर नस दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी थेट स्वरुपात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना लक्ष्य केले आहे.
भाजप सरकार सत्तेवर असताना आम्ही कांवड यात्रेत सामील लोकांवर फुलांचा वर्षव केला आणि दंगलखोरांवर नजर ठेवण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात केले. आता कांवड यात्रा होते आणि वातावरणही बिघडत नसल्याचे योगींनी म्हटले आहे.
पश्चिम उत्तरप्रदेशात महत्त्वाचा मुद्दा
कांवड यात्रेचा मुद्दा पश्चिम उत्तरप्रदेशात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशा स्थितीत या मुद्दय़ाद्वारे एक मोठय़ा मतपेढीला योगींनी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप सरकारमध्येच हिंदूंना धार्मिक कार्य करण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते असा हा संदेश होता. यापूर्वी पश्चिम उत्तरप्रदेशच्या 250 हून अधिक जाट नेत्यांची भेट घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी आंदोलनानंतर निर्माण झालेला असंतोष दूर करण्याचा प्रयत्न केला. योगींनी याप्रकरणीही मोठे वक्तव्य पेले आहे. मुजफ्फरनगर दंगलीनंतर एका सभेत सामील होणाऱया शेतकऱयांवर सप सरकारकडून गोळीबार करण्यात आला होता असे त्यांनी म्हटले आहे.
समाजवादी पक्ष लक्ष्य
ज्यांच्या टोपी हिंदूंच्या रक्ताने माखलेल्या आहेत आणि ज्यांनी रामभक्तांवर गोळीबार करविला होता, ते शांतता आणि बंधुभावाबद्दल बोलत आहेत. 2017 पूर्वी सप शासनकाळात दर तिसऱया दिवशी दंगली होत होत्या असा आरोप योगींनी केला आहे.
गुंडांना शिकविला धडा
आम्ही आमच्या कार्यकाळात गुंडांवर जरब बसविली आहे. मुरादपूरचे माजी आमदार बहाव चौधरी यांचा उल्लेख करत योगींनी एक गुंड चूकून आमदार झाला होता, त्याला आमच्या सरकारने तुरुंगात पाठविल्याचे म्हटले आहे. सपने आता हिस्ट्रीशीटरला उमेदवारी दिली आहे. 10 मार्चनंतर देखील हा हिस्ट्रीशीटर दयेची याचना करताना दिसून येईल. उत्तरप्रदेशात 10 मार्चनंतर देखील कायद्याचे राज्य राहणार आहे. 55 वर्षांपर्यंत त्यांना सरकार चालविण्याची संधी मिळाली, परंतु त्यातील कुणीच काहीही केले नाही. काका-पुतण्या (शिवपाल यादव-अखिलेश), आत्या-भाचा (मायावती-अखिलेश) आणि भाऊ-बहिण (राहुल गांधी-प्रियंका वड्रा) यांच्याकडे उत्तरप्रदेशकरता कुठलेच व्हिजन नसल्याचे योगी म्हणाले.