आटपाडी/ प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाने ‘आत्मनिर्भर भारत’ ही योजना सुरु केली आहे . याची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी लोकनेते हणमंतराव पाटील दूध संघ एक पाऊल पुढे आलेला आहे. दूध संघाचे अध्यक्ष विशालकाका पाटील यांच्या पुढाकाराने 118 शेतकऱ्यांचे फॉर्म भरण्यात आले.
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे या योजनेची सुरुवात दूध संघाचे अध्यक्ष विशालकाका पाटील व जनरल मॅनेजर डकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली . यावेळी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विशालकाका पाटील यांनी दूध संघाच्या माध्यमातून अनेक शेतकरी आपल्या संस्थेशी जोडलेले आहेत. या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ पुरवणे हे क्रमप्राप्त आहे. म्हणून आज केंद्र शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत संस्थेच्या प्रत्येक संकलन केंद्रावर या अर्जाचे वाटप होणार आहे. ही योजना लोकनेते मा. हणमंतराव पाटील दूध संघाच्या वतीने ज्या शेतकऱ्यांचे दूध हे कोणत्याही मदतीशिवाय थेट संघ खरेदी करतो, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, असे सांगितले .
किसान क्रेडिट कार्ड वर पीक कर्जाशिवाय 1 लाख 60 हजार रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहेत. हे कर्ज दुधाळ पशुधन खरेदीसाठी आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा यासह वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती व पशुधनाची यादी असा एक पानी अर्ज आमच्या दूध संकलन केंद्रात उपलब्ध आहे तो भरून जमा करावा. हे अर्ज संघामार्फत बँकांना सादर केले जातील व बँका आपल्याला पतपुरवठा करतील. या योजनेमुळे केसीसी धारक शेतकऱ्याला 50 व 75 टक्के अनुदानाच्या योजनेसाठी प्राथमिक भागभांडवल कार्डद्वारे मिळणार असून शंभर टक्के सवलतीमध्ये पशुपालन व्यवसाय करता येणे आता सोपे होणार असल्याचे विशाल पाटील म्हणाले.
आगामी काळात आटपाडी, खानापूर सहकार क्षेत्रातील दूध उत्पादक समृद्ध करू , असा विश्वासही अध्यक्ष विशालकाका पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी संकलन केंद्रप्रमुख प्रशांत गवळी, देवानंद जावीर, अमोल काटे, पोपटराव वाघमारे, कांतीलाल कराडे, संघ व्यवस्थापक ऐवळे तसेच दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.