एपीएमसीतील दुकानदारांच्या व्यवहाराला फटका : दिवसेंदिवस वाढते कर्ज : शासनाचा निधी वाया जाणार असल्याची दुकानदारांत चर्चा
वार्ताहर /अगसगे
गांधीनगरजवळील जय किसान भाजी मार्केट विरोधात एपीएमसी भाजी मार्केटच्या गाळेधारकांचे धरणे आंदोलन शुक्रवारी दुसऱया दिवशीही सुरूच आहे. जोपर्यंत राज्याचे सहकार सचिव एस. टी. सोमशेखर आंदोलनस्थळी भेट देऊन न्याय देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापाऱयांनी केला आहे.
गुरुवारी एपीएमसीच्या मासिक बैठकीत भाजी मार्केटमधील गाळेधारकांनी त्यांना जाब विचारत सभागृहामध्ये बराच वेळ कोंडून ठेवले होते. त्यामुळे वातावरण तापले असून हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे व आता व्यापाऱयांनी आक्रमक पवित्रा घेत न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. सलग दुसऱया दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले आहे.
शासनाने एपीएमसीत सुमारे 80 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज भाजी मार्केट बांधले आहे. यामधील प्रत्येक गाळय़ाला सुमारे 20 लाख ते एक कोटी रुपये देऊन भाजी व्यापाऱयांनी गाळे खरेदी केली आहेत. ही रक्कम जमा करण्यासाठी भाजी दुकानदारांनी बँकेतून कर्ज काढून दागिने विकून पैसे जमवून एपीएमसीवर विश्वास ठेवून गाळे खरेदी केले आहेत. मात्र, एपीएमसीतील काही अधिकाऱयांनी लाच घेऊन खासगी भाजी मार्केटला परवानगी दिली आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी मार्केटमधील व्यवहार निम्म्याहून अधिक ठप्प झाले आहेत. उत्पन्नाचा व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने भाजी मार्केटमधील दुकानदारांचे कर्ज दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे आम्ही आंदोलनाचे अस्त्र उगारल्याची व्यथा भाजी मार्केट व्यापाऱयांनी मांडली.
एपीएमसी कार्यालयासमोर दुकानदारांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. आंदोलनात शंभरहून अधिक व्यापाऱयांनी भाग घेतला आहे. त्यामुळे आंदोलनाला मोठे स्वरुप प्राप्त झाले.
शासनाचा निधी वाया जाण्याची शक्मयता
शासनाने एपीएमसीमध्येच सर्व व्यवहार व्हावेत यासाठी भाजी मार्केट, फळ मार्केट, तेजी-मंदी मार्केट यासाठी सुमारे 80 कोटी रुपये खर्चून गाळे बांधण्यात येत आहेत. सध्या भाजी मार्केटच्या 134 गाळय़ांमध्ये व्यवहार सुरू आहे तर 33 गाळे बांधून तयार आहेत आणि फळ मार्केटसाठी 52 गाळय़ांचे काम सुरू आहे तर 9 गाळे बी-बियाणांसाठी तयार आहेत व 35 दुकानांचा प्रस्ताव सुरू आहे. तसेच भाजी मार्केटमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी दोन जलशुद्धीकरण केंद्र तयार केली आहेत.
तसेच भाजी मार्केट सुसज्ज करण्यासाठी पुन्हा 25 कोटी रुपये शासनाने मंजूर केले असल्याची माहिती युवराज कदम यांनी दिली. सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन पैसा खर्च करत असताना काही लाचखोर अधिकाऱयांनी बेकायदेशीर खासगी भाजी मार्केटला परवानगी दिल्याने शासनाचा निधी वाया जाणार असल्याची चर्चा दुकानदारांमध्ये होत आहे.
15 दिवसात अहवाल द्यावा !
राष्ट्रीय महामार्गाजवळ जय किसान खासगी भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करून या खासगी भाजी मार्केटला परवाना दिल्याबद्दल कृषी खात्याचे डेप्युटी डायरेक्टर यांना जिल्हाधिकाऱयांनी नोटीस बजावली आहे. खासगी भाजी मार्केटमध्ये मूलभूत सुविधा नसून खासगी भाजी मार्केटमुळे एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाला आवक येत नसल्यामुळे एपीएमसीला नुकसान होत आहे. त्यामुळे दि. 11 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी आरोप केला होता. खासगी भाजी मार्केटला भेट देऊन कायद्याचे उल्लंघन झाल्याची पाहणी करून पंधरा दिवसांच्या आत याबाबत अहवाल द्यावा, असे जिल्हाधिकाऱयांनी कृषी खात्याच्या डेप्युटी डायरेक्टरना नोटीस बजावली आहे.
सहकार मंत्री येईपर्यंत आंदोलन सुरू : सतीश पाटील
भाजी मार्केटमध्ये कायदेशीर एपीएमसीच्या नियमानुसार व्यवहार होतात. आम्ही शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळवून देतो. या ठिकाणी शेतकऱयांची फसवणूक होत नाही. यामुळे व्यवहार चांगला होत होता. मात्र, एपीएमसीचे सेपेटरी डॉ. के. कोडीगौडा, राज्याचे कृषी निर्देशक करीगौडा आणि उपनिर्देशक महांतेश पाटील यांनी लाच घेऊन खासगी भाजी मार्केटला परवानगी दिल्याने येथील दुकानदारांवर उपासमारीची वेळ आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि राज्याचे सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
दुकानदारांना मानसिक त्रास : नितीन मुतगेकर
खासगी भाजी मार्केट निर्माण करण्याची आवश्यकता नव्हती. सरकार 80 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज भाजी मार्केट निर्माण करत असताना काही भ्रष्ट अधिकाऱयांनी लाच घेऊन खासगी भाजी मार्केटला परवानगी दिली आहे. यामुळे दुकानदारांवर मोठा परिणाम झाला आहे. कर्जे वाढत चालली असून दुकानदारांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे दुकानदार अडचणीत आले आहेत. यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
जयकिसान’चा परवाना रद्द करा : हंचिनमनी
खासगी भाजी मार्केट ज्या जागेत आहे, त्या जागेचा मालक 2011 साली मयत झाला आहे. त्याच्या सहीची नक्कल करून 2015-16 ला एनए लेआऊट करून घेतले आहे. त्यामुळे त्याचे खासगी भाजी मार्केटच बेकायदेशीर आहे. त्यामुळे जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्या भ्रष्ट अधिकाऱयांना निलंबित करा : भाऊराव शहापूरकर
एपीएमसीमध्ये खरेदी-विक्रीची लायसन्स (परवाना) देण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ घेतात. मात्र, खासगी भाजी मार्केटच्या दहा एकर जमिनीमध्ये भाजी मार्केट सुरू करण्यासाठी लाचखोर अधिकाऱयांनी केवळ चार तासांमध्ये परवाना देतात. याबाबत आमच्याकडे सबळ पुरावे आहेत आणि त्या भ्रष्ट अधिकाऱयांना निलंबित करावे, अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.