तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
किसान रेल ही रेल्वे दिल्लीतील मार्केटला, करमाळा तालुक्यातील कंदर, वांगी, जेऊर, चिखलठाण येथील शेतकऱ्यांना ताजा भाजीपाला व फळे म्हणजे केळी, बोरे, सीताफळ, कारले, पपई, लिंबू, मेथी, कोथंबीर, पालक, पेरू, आल्ले आदी खाद्योपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारच्या ताज्या मालाची वाहतुक होत होती.
हा माल हुबळी ते दिल्ली या मालवाहतूक रेल्वेत जात असल्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत होता. परंतु काही कारणास्तव अचानकपणे ही मालवाहतूक रेल्वे वरिष्ठ रेल्वे अधिकारी वर्गाने बंद होणार असल्याचे सांगितले. हे कंदर येथील निर्यातदार किरण नवनाथ डोके यांना समजताच त्यांनी भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांना सांगितले, आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल दिल्ली येथे जाण्याचे थांबणार व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होणार, हे कळल्यानंतर गणेश चिवटे यांनी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या गोष्टीची माहिती दिली. माहिती मिळताच खा.नाइकनिंबाळकर यांनी त्याचा पाठपुरावा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना या रेल्वेचे शेतकऱ्यांसाठी काय महत्व आहे, हे सांगितले आणि लवकरात लवकर ही रेल्वे चालू करावी, असे आदेश दिले. त्यांच्या त्वरित केलेल्या प्रयत्नामुळे बंद होणारी मालवाहतूक रेल्वे पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली. त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असल्याचे चित्र दिसून आले.