मानसवाडा-जुवेकातर शेती झाली जलमय
प्रतिनिधी/ पणजी
मानसवाडा – कुंडई येथील जुवेकातर खाजनाच्या मानशीची सर्व दारे उघडी करुन समुद्राचे खारे पाणी आत घेतल्यामुळे ते शेतजमिनीमध्ये घुसले आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे हा प्रकार सुरु असून त्यामुळे तब्बल 80 शेतकरी संकटात सापडले आहे. आता शेतीची काम करायची तरी कशी? असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ हा प्रकार सुरु असून त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. पाणी आतमध्ये घेतल्याने शेतकऱयांवर मोठे संकट ओढवले आहे. अनेक समस्यांचा सामना करुन आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती करणाऱया या शेतकऱयांवर हे आणखी एक मोठे संकट उभे आहे.
शेतजमिनीसह जवळच्या भाटातही पोहोचले पाणी
पाणी एवढे भरले आहे की संपूर्ण शेतजमीन पाण्याखाली गेली असून ते पाणी आता तेथेच असलेल्या भाटातही पोहोचले आहे. त्यामुळे माडांनाही धोका निर्माण झाला आहे. शेतकऱयांची कोणतीही पर्वा न करता हा सारा बेकायदेशीर प्रकार बिनदिक्कतपणे सुरु आहे. काही शेतकऱयांनी हा प्रकार बंद करण्यास संबंधित मानशीवाल्याला सांगितले होते. मात्र तो शेतकऱयांचे काहीही ऐकून घेत नाही. केवळ चालढकल करीत आहे. त्यामुळे हे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतीची कामे करायची तरी कशी?
मानशीची सर्व दारे उघडी करण्यात आल्याने दिवसरात्र पाणी शेतजमिनीत घुसत आहे. रोज पाण्याची पातळी वाढत आहे. वाढत्या पाण्याबरोबर शेतकऱयांची चिंताही अधिक वाढतच आहे. संपूर्ण शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱयांना शेतीची कामे करणे शक्य होत नाही. लागवड करण्यापूर्वी शेतजमीनीची खणणी करणे आवश्यक आहे, त्याशिवाय अन्य काही कामे करायची असतात, मात्र शेतकऱयांना ती कामे करण्यास मिळत नाही. ही परिस्थिती अशीच राहिल्यास आम्ही लागवड तरी कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱयांनी उपस्थित केला आहे.
पाण्यामुळे 80 शेतकरी संकटात
खाजन शेतीत पिक चांगले येते, मात्र त्यासाठी अनेक कामे वेळेवर करावी लागतात. त्याशिवाय त्या जमिनीत केवळ आसगो व कोंरगुट या दोनच जातींचे भातपिक घ्यावे लागले. ही जमीन दुसऱया पिकासाठी वापरता येत नाही. त्यामुळे या शेतीवर अवलंबून असलेल्या कुंडई परिसरातील 80 शेतकऱयांवर हे पाणी भरल्याने संकट ओढवले असून ते चिंताग्रस्त बनले आहेत.
याप्रकरणी फोंडा तालुक्याच्या मामलेदारांनी त्वरित लक्ष घालावे. त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, तसेच शेतकऱयांचे दुःख समजून घ्यावे. बेकायदेशीरपणे चाललेला आणि शेतकऱयांच्या पोटावर संकट बनलेला हा प्रकार त्वरित बंद करावा, अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे.