समाजसेवक तथा काँग्रेस नेते समील वळवईकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /तिसवाडी
कुंभारजुवे मतदारसंघात गेली वीस वर्षे वेगवेगळय़ा माध्यमांतून समाजासाठी योगदान देणारे समाजसेवक तसेच काँग्रेसनेते समील वळवईकर यांचा वाढदिवस-गौरव सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. मतदारसंघाच्या विविध ग्रामपंचायत क्षेत्रांतील तसेच गोव्याच्या अन्य भागांतून आलेल्या चाहत्यांनी त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना येत्या विधानसभा निवडणुकीतही विजयी भव, असे आशीर्वाद दिले.
दिवसभरात त्यांना सुमारे चारहजार चाहत्यांनी त्यांच्या घरी तसेच सभागृहात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या उपस्थितीत वळवईकर यांनी केक कापला. कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, करमळीचे सरपंच राजेश नाईक, काँग्रेसचे नेते एल्वीस गोम्स, संकल्प आमोणार तसेच अन्य पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक, मित्रमंडळी तसेच नातेवाईक उपस्थित होते. वळवईकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते स्वतःची वाहने घेऊन आले होते. वाढदिवसाचे ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून महिलांना मिक्सर किंवा इंडक्शनसारख्या वस्तूही देण्यात आल्या नव्हत्या. वळवईकर यांनी केवळ मोबाईलवर मेसेज टाकला होती, तरीही चार हजारांहून लोकांनी त्यांना आशीर्वाद दिल्यामुळे ते भारावून गेले होते.
यावेळी बोलताना एल्वीस गोम्स म्हणाले की गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिल्लीत जावे लागल्याने ते वाढदिवसाच्या सोहळय़ात सहभागी होऊ शकले नाही. पण वळवईकर यांना सर्वांच्या शुभेच्छा आहेत. समील वळवईकर हे नव्या दमाचे आणि राजकारणाचे गाढे अनुभवी नेतृत्व आहे. एवढेच नव्हे तर एक स्वच्छ युवा चेहरा म्हणून कुंभारजुवे मतदारसंघ त्यांच्याकडे पाहत आहे. त्यांची समाजाप्रती असलेला दृष्टिकोन खूप सकारात्मक असून समाजसेवा हा त्यांचा पिंड आहे. त्याच्या जोरावरच आज त्यांच्याबरोबर मोठी जनशक्ती आहे. अशी ही व्यक्ती आज काँग्रेसमध्ये आहे, हे काँग्रेससाठी शक्तीवर्धक व मोठी जमेची बाजू आहे. पुढील आयुष्यातही ते एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून यशस्वी होतील, असा विश्वासही एल्वीस गोम्स यांनी व्यक्त केला.
संकल्प आमोणाकर, मंत्री गोविंद गावडे, आमदार रोहन खंवटे व अन्य अनेक चाहत्यांनी यावेळी समील वळवईकर यांची प्रशंसा करणारी आणि त्यांना शुभेच्छा देणारी मनोगते व्यक्त केली.
समाजामध्ये नाती अनेक असतात, परंतु मनाचे नाते जुळणे आणि ते टिकविणे हे महत्वाचे असते. कुंभारजुवे मतदारसंघातील आमचे कार्यकर्ते, मतदार, हितचिंतक, समर्थक, नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांचे आणि आपले मनाचे नाते जुळले आणि टिकून राहिले, हे आपण आपले भाग्य समजतो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपली भावी वाटचालही नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास आपल्याला आहे. कुंभारजुवेतील लोकांसाठी मी परका, बाहेरचा नाही, त्यांचा स्वतःचा जीवलग आहे. गेली वीस वर्षे ही नाते असून येत्या काळात ते अधिकाधिक दृढ होत जाईल, असेही ते म्हणाले.