प्रतिनिधी/ चिपळूण
पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडणाऱया कुंभार्ली घाटातील रस्ते पूर्णपणे उखडल्याने वारंवार होत असलेले अपघात आणि त्यामुळे होणाऱया वाहतूककोंडीमुळे आता या घाटातील रस्ता दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी 30 डिसेंबरपासून 2 दिवस हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र वर्षअखेर असल्याने ही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे दुरुस्ती सुरू असली तरी वाहतूक सुरूच राहणार आहे.
पावसाळय़ापूर्वी कुंभार्ली घाटातील रस्ते दुरूस्तीचे काम हाती घेतले गेले होते. सोनपात्रापासून पोफळी गावच्या हद्दीपर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. मात्र डांबरीकरणानंतर काही दिवसांतच हा रस्ता उखडला. त्यामुळे पावसाळय़ाचे 4 महिने या घाटातील खड्डय़ांतूनच प्रवास करावा लागला. घाटातील पोलीस चौकी सोडल्यानंतर पुढे अनेक ठिकाणी वळणावर रस्ता वाहून गेला आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोल चर पडली आहे. त्यामुळे पावसाळ्य़ात घाटात असंख्य अपघात झाले. सोनपात्रा वळणावरील रस्त्याची दुरवस्था मोठय़ा प्रमाणात झाल्याने येथेही वाहनांचे अपघात झाले. त्यातच पावसाळय़ात घाटरस्ते खचल्याने आंबा तसेच आंबेनळी घाटातून अवजड वाहतूक बंद करण्यात आली. अणुस्कुरा घाटाचीही दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे सध्या घाटमाथ्यावरून कोकणात येणाऱया अवजड वाहनांसाठी एकमेव कुंभार्ली घाटाचा पर्याय उरला आहे. त्यामुळेच या घाटात वाहतुकीची वर्दळ आणि अवजड वाहतुकीची भर पडल्याने घाट रस्त्यांची आणखी बिकट अवस्था झाली. वारंवार घडणाऱया अपघातांमुळे या घाटात वारंवार वाहतूक कोंडीला समोर जावे लागत आहे.
दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र वाहतुकीमुळे खड्डे भरण्याचे कामही व्यवस्थित करता येत नसल्याने भरलेले खड्डेही पुन्हा उखडले. त्यामुळे आता 2 दिवस रस्ता दुरूस्तीसाठी घाटातील अवजड वाहतूक पोफळी नाका ते घाटमाथादरम्यान बंद करण्याबाबत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱयांकडे परवानगी मागितली होती. वर्ष अखेर मुले पर्यटकांची होणारी गैरसोय आणि परवानगी पत्राला झालेला उशीर यामुळे घाईगडबडीत वाहतूक बंद करणे योग्य ठरणार नसल्याने परवानगी नाकारली गेल्याचे वृत्त आहे दरम्यान बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळालेली नाही. या संदर्भात बांधकाम विभागाचे राजरत्न रणदिवे यांच्याशी संपर्क साधला असता घाट दुरुस्तीचे काम गुरुवारपासून सुरु करण्यात येणार आहे. वाहतूक बंदला परवानगी मिळाली नसल्याने घाट सुरूच राहणार असल्याचे सांगितले
सोशल मिडियावर ‘घाट बंद’ने धुमाकूळ
कुंभार्ली घाट बंदबाबत बांधकाम विभागाने मागितलेल्या परवानगीचे पत्र बुधवारी सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले. वाहतूक 2 दिवस बंद राहणार असल्याने अनेकांनी आपले प्लॅन रद्द अथवा बदल केले. तसेच काहींनी आपले मार्गही बदलले. मात्र सायंकाळी घाट सुरूच राहणार असल्याचे कळल्यावर सर्वांनाच हायसे वाटले.