कारखान्याच्या ५९ व्या बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ प्रसंगी चेअरमन,माजी आमदार चंद्रदीप नरके यांची घोषणा
प्रतिनिधी / वाकरे
कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना आगामी गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ३०४५ रुपये प्रमाणे एकरकमी एफआरपी देणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. कुडित्रे ता. करवीर येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या ५९ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ प्रसंगी चेअरमन नरके बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक विलास पाटील- आणि त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांच्या हस्ते विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर विधिवत बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.
चेअरमन नरके यांनी गेल्या हंगामात कारखान्याने साडेपाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून सात लाख साखर पोत्यांचे उत्पादन केले आणि १२.६९ टक्के साखर उतारा मिळवल्याचे सांगितले. कारखान्याने गतवर्षीच्या ऊसाला प्रतिटन उच्चांकी ३११९ रुपये संपूर्ण एफआरपी ऊस उत्पादकांना आदा केल्याचे ते म्हणाले. सुमारे १७४ कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले.
आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याकडे १० हजार २९६ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून कारखान्याने ६ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे ते म्हणाले. सरकारने ऊस तोडणीदार, वाहतूकदार आणि कामगार पगार वाढ केली मात्र साखरेचे दर स्थिर आहेत.त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा दर प्रति किलो ३६ रुपये करावा तरच हा उद्योग सावरेल असे ते म्हणाले. कारखान्याने चांगल्या पद्धतीने ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली असून गतवर्षी राज्यात दोन नंबरचा ऊस दर दिल्याचे ते म्हणाले. या वर्षीच्या गळीत हंगाम पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.