आठवडे बाजारात वाहतुकीची मोठी समस्या
वार्ताहर / कुंभोज
कुंभोज ता. हातकणंगले येथील आठवड्यातून असणारा बुधवार व रविवारचा बाजार व या दिवशी सकाळी असणारी वाहतुकीची समस्या सर्वसामान्य नागरिकांना व परिसरात राहणाऱ्या लोकांना मोठी डोकेदुखी बनली आहे. आठवड्यातून बुधवार, रविवार रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत मोठा बाजार भरतो सदर बाजारासाठी परिसरातील हिंगणगाव, कवठेसार, नेज, शिवपुरी वाठार, नंरदे, भागातील लोक, व्यापारी मोठ्या प्रमाणात बाजारसाठी येतात.
ऊस तोडणीचा सिझन चालू असणारे ऊस तोडणी कामगारांची ही बाजारात मोठी उपस्थिती असते. परिणामी या बाजार वेळेत बाजारासाठी येणाऱ्या तसेच व्यापारी लोकांच्या गाड्या रस्त्याकडेला पार्किंग केल्या जातात, यामुळे ऊस वाहतूक करणारी मोठी वाहने, एसटी वाहतूक व अन्य गावातील प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांना प्रवास करताना मोठा अडथळा निर्माण होतो. शेकडोंच्या संख्येने टू व्हिलर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पँकिग केल्या जातात यामुळे सदर रस्त्यावरून एकेरी वाहतूक करत असताना मोठ्या वाहनांना तासनतस वाट पाहावी लागते. बऱ्याच वेळा छोटे-मोठे अपघात घडतात व अपघात घडल्यास दोष मात्र शेतकऱ्याचा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहना व वाहनचालक यांच्यावर ठेवला जातो. बऱ्याच वेळा वाहनचालकांना नागरिकांचा मारही खावा लागतो. पण अपघात का घडला ? याला जबाबदार कोण ? हे मात्र चौकशी केले जात नाही.
ग्रामपंचायत कुंभोज यांनी सदर बाजारासाठी येणाऱ्या केळी व्यापाऱ्यांना केळी विक्रिसाठी उभी असणारी वाहने लावू नका अशा वारंवार सूचना करूनही सदर केळी व्यापारी रस्त्याच्या सेंटरला आपली वाहने पार्क करतात, त्यामुळे इतर नागरिकांना व वाहतूक करणार्या नागरिकांना मोठी वाहतूक समस्या निर्माण होत आहे. परिणामी, सदर व्यापाऱ्यांनी आपली वाहने अन्य ठिकाणी उभी करून बाजारातला वाहतूक अडथळा कमी करावा अशी मागणी नागरिकांतून होत असून ग्रामपंचायतीने वाहतुकिस अडथळा करणाऱ्या सदर वाहनांच्यावर कडक कारवाई करावी तसेच गेल्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित असणारा बायपास रस्त्याचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी कुंभोज ग्रामस्थांतुन होत आहे. परिणामी सदर बायपास रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, निव्वळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला महत्त्व द्यावे अशी मागणी होत आहे.