कुंभोजात वारणा पुलावर जिल्हाबंदीचे आदेश धाब्यावर
कुंभोज/वार्ताहर
सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे जिल्हा अंतर्गत वाहतुकीस बंदी असताना कुंभोज हद्दीतील वारणा नदीवरील बॅरिकेडस्चे पत्रे काढून नागरिक राजरोसपणे वाहतूक करीत जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कुंभोज येथील वारणा नदीवरील पुलावर सध्या कोणताही बंदोबस्त नसल्याने पुलावर जिल्हा बंदीसाठी उभे केलेले पत्र्याचे बॅरिकेडस् अज्ञातांनी अक्षरश: नदीत फेकून दिले आहे. त्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात बिनधास्तपणे वाहतूक मोठ्या जोरात चालू झाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. परिणामी काही वेळा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दमदाटी करून काही नागरिकांनी पत्रे काढण्याचा प्रयत्नही केला होता. त्या वेळेला वेळेत ग्रामपंचायतीने हस्तक्षेप करून सदर नागरिकांना मागे हटवले होते. परिणामी सध्या ग्रामपंचायत कुंभोज वर प्रशासक नियुक्ती झाल्याने सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नदी पुलाकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे प्रशासनाने तातडीने याची गांभीर्यने दखल घेऊन पुलावर पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी नागरिकांतून होत होती.
परिणामी सदर घटनास्थळी हातकणंगले पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी पीआय प्रणील गिलटा यांनी भेट देऊन वारणा नदी पुलाच्या काढून टाकलेल्या पत्र्याच्या शेडची परिसराची पाहणी करून सदर ठिकाणावर तात्काळ पत्रे लावण्याचे आदेश प्रशासनास दिले परिणामी कोणीही नागरिक संचार बंदीचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.