तौक्ते वादळामुळे ट्रॉलर जेटीवर, स्थिती सुधारण्याची प्रतीक्षा
प्रतिनिधी / कुंकळ्ळी
दक्षिण गोव्यातील महत्त्वपूर्ण कुटबण जेटीवरील सर्व व्यवहार तौक्ते वादळामुळे पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. राज्यातील यंदाचा मासेमारीचा हंगाम संपण्यास आणखी काही दिवस बाकी असले, तरी त्यापूर्वीच वादळामुळे मासेमारी थांबवण्याची पाळी ट्रॉलरमालकांवर आलेली आहे
कुटबण जेटीला भेट दिली असता येथील लहान-मोठे असे सर्व ट्रॉलर जेटीवर आणून नांगरून ठेवले असल्याचे दिसून आले. मासेमारीचा हंगाम 31 रोजी संपणार असून त्यापूर्वी शक्मय असेल तितकी मासेमारी करण्याचा इरादा ट्रॉलरमालकांनी बाळगला होत. पण वादळामुळे त्यांची निराशा झालेली आहे. ट्रॉलर आणखी किती दिवस बंद ठेवावे लागतील हे कळणे कठीण झाले आहे. काही ट्रॉलरमध्ये जरी बर्फ भरून ठेवण्यास सुरुवात केली असली, तरी अजून कोणी समुद्रात उतरलेले नाही. स्थिती सुधारण्याची ते वाट पाहत आहेत कुटबण जेटीवर 300 पेक्षा जास्त लहान-मोठे ट्रॉलर असून यंदाचा हंगाम हा त्यांच्यासाठी फारसा काही चांगला गेलेला नाही. त्यातल्या त्यात मोठय़ा ट्रॉलरांनी काही प्रमाणात कमाई केली असली, तरी बाकीच्यांसाठी हंगाम खराबच गेलेला आहे. दरम्यान, काही मच्छीमारांशी संवाद साधला असता एलईडी दिवे वापरून मासेमारी करण्यावर बंदी असली, तरी हा प्रकार बिनदिक्कत चालू असून त्यामुळेच मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी कैफियत त्यांनी मांडली. एलईडी दिव्यांच्या वापरामुळे समुद्राच्या पाण्याची उष्णता वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.