वार्ताहर / कास :
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बामणोली कार्यालय हद्दीतील म्हाळुंगे बिट अंतर्गत येणाऱ्या आडोशी कुटीची 29 जून रोजी तोडफोड व जाळपोळ झाली होती. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तापोळा पोलीस आऊट पोस्टचे हवालदार गायकवाड, माने यांनी आकल्पे ता.महाबळेश्वर गावातील अविनाश गोविंद जाधव याला अटक केली होती. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, यामध्ये त्याच गावातील अजून तिघांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली.
तुषार यशवंत सावंत (22), शैलेश महादेव साळुंखे (21), किरण रामचंद्र साळुंखे (21) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 43 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये 3 बॅटरी, 1 टॉर्च, 1 सौर पॅनल, 5 लिटर डिझल टाकी हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी 2 जुलै रोजी या चारही आरोपींना मेढा येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चौघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी अधिक तपास हवालदार आर.एन. गायकवाड करत असून, यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग यांचा स्वतंत्र गुन्हा नोंद असल्याने पोलीस खात्याकडून या चौघांचाही ताबा बामणोली कार्यालय वनक्षेत्रपाल बी.डी. हसबनिस यांचेकडे देण्यात आला. त्यांनी अधिक तपास केला असता गुन्ह्यात वापरण्यात आलेली अविनाश गोविंद जाधव यांची फायबर होडी जप्त करण्यात आली. शनिवारी पुनश्च त्यांना मेढा येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता. त्यांना सोमवारपर्यंत (दि.5) वनकोठडी सुनावण्यात आली.